वृत्तसंस्था
नंदीग्राम : हाय व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघात मतदान सुरू असतानाच ऐन मध्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय दलांवर बेछूट आरोप करीत ते स्थानिक मतदारांना मतदान करू देत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी मतदान केंद्रावरूनच थेट राज्यपालांना फोन लावून या प्रकारात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.Mamata’s agitation at the polling station in Nandigram
गेली काही वर्षे सातत्याने ज्या राज्यपालांना टीकेचे लक्ष्य केले, त्याच राज्यपालांना नंदीग्रामच्या मतदान केंद्रावरून ममता बॅनर्जी यांना वेळ आली. हा फोन करताना सुध्दा त्यांनी राज्यपाल ज्या केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात, त्याच केंद्रीय यंत्रणाविरूध्द तक्रार करण्याची संधी साधली आहे.
ममता आज सकाळपासून नंदीग्राममध्ये ठाण मांडून आहेत. विविध मतदान केंद्रांना त्या भेटी देत आहेत. पण केंद्रीय यंत्रणा स्थानिकांना मतदान करू देत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. हा आरोप करण्यासाठीच त्यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांना मतदान केंद्रावरून फोन केला.
त्या म्हणाल्या, की सकाळपासून मी तक्रार करत आहे, पण आता मी तुम्हाला विनंती करत आहे…कृपया यामध्ये लक्ष घाला. केंद्रीय यंत्रणा स्थानिक नागरिकांना मतदान करू देत नाहीत. हे प्रकार थांबवा”, असे ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांना फोनवरून सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रीय यंत्रणा स्थानिक मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रात प्रवेश करू देत नसल्याचा आरोप केला. ममतांनी नंदीग्राममधील मतदान केंद्राबाहेर आंदोलनच सुरू केले आहे.
ममतांच्या आंदोलनाची बातमी पसरताच मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूंनी भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्त्यांचा प्रचंड जमाव जमला. त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स पसिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.