विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशात भारतीय जनता पक्ष विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच योग्य आहेत.कॉँग्रेसचे नेते आपसांत भांडून भाजपचा विजय सोपा करत आहेत, असा घरचा आहेर आसाम कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी दिला आहे.Mamata deserves to lead anti-BJP alliance, Congress is raising BJP by quarreling
बोरा यांनी नुकताच तृणमूल कॉंग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला आहे. बोरा म्हणाले, कॉंग्रेस भाजपचा पराभव करू शकत नाही याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी पक्षत्याग केला आहे. याचे कारण म्हणजे वैचारिक दृष्टिकोनातून मी काँग्रेससोबत राहिलो तरी काहीही करू शकत नाही. माझे सर्व काम, क्षमता आणि प्रयत्न वाया जातील.
त्यामुळे आपल्या संविधानाचे रक्षण करू शकणाऱ्या आणि भाजपला रोखू शकणाऱ्या पक्षात जावे, असे मी ठरवले आहे. माझ्यासाठी हा पक्ष टीएमसी आहे आणि म्हणून मी टीएमसीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.भाजप राज्यघटना, लोकशाही आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका आहे. काँग्रेस हे रोखू शकेल अशी मला आशा होती.
मात्र दुदैर्वाने भाजपशी लढण्याऐवजी सर्वच राज्यात सर्वच स्तरावर काँग्रेसमध्ये भांडणे सुरू आहेत.बोरा म्हणाले, आसाममध्ये आमचे नाव आसाम तृणमूल काँग्रेस असेल. आसाममध्ये विविध धर्म, जाती, समुदाय, वंश आणि संस्कृती आहेत. भाजपने सर्वांची विभागणी केली आहे.
आम्ही सर्वांना एकत्र आणू आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लढा देऊ. मी कॉँग्रेसमध्ये 1976 पासून काम करत आहे. मात्र, कॉँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे कार्यकर्ते निराश झाले आहेत. कॉँग्रेसच्याच काही नेत्यांनी मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्याशी गुप्तपणे हातमिळवणी केली आहे.