ममतांची खरी मळमळ त्यांच्याच वक्तव्यातून बाहेर आली; म्हणाल्या, जर पंतप्रधान – मुख्यमंत्री मिटिंग होती, तर तिथे बाकीचे भाजप नेते कशाला हजर होते…?? I request PM to withdraw this order of Chief Secy (being attached to DoPT) & let us work., says West Bengal CM
वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या त़डकाफडकी बदलीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जास्तीच खवळल्या असून त्यांच्याच वक्तव्यातून कालच्या मिटिंग फियोस्काची मळमळ बाहेर पडली… पंतप्रधान कार्यालय एकतर्फी बातम्या देतेय असा आरोप करून ममतांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. बंगालच्या मुख्य सचिवांची बदली रद्द करण्याची मागणी ममतांनी केली. त्याचवेळी केंद्र सरकारवर आरोपांची सरबत्ती देखील केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होणार असल्याचे मला त्यांच्या एसपीजीने सांगितले. मी तिथे पोहोचले तेव्हा मिटिंग आधी सुरू झालेली होती. जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होती, तर तिथे बाकीचे भाजप नेते का उपस्थित होते?, असा सवाल ममतांनी केला. राज्यपाल जगदीप धनकड आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे पंतप्रधानांच्या बैठकीला हजर होते.
ममता पुढे म्हणाल्या, की आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की आम्हाला दिघाला जायचे आहे. आम्हाला परवानगी द्या. मी त्यांच्याकडे राज्यांच्या मागण्यांचे निवेदन संपवून निघाले. यात माझे काय चुकले. सध्या पीएमओकडून एकतर्फी बातम्या पसरविल्या जात आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये संसदेत विरोधी पक्षनेता नाही. गुजरातमध्ये विरोधी पक्षनेत्याला बैठकीला बोलावले नाही. मग बंगालमध्येच वेगळा न्याय का… मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आणि राज्यपाल राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतात. केंद्र सरकार टीम्स राज्यात पाठवत राहते. आमची नेमकी चूक काय झाली, ते सांगा, असे वक्तव्य देखील ममतांनी केले.
कृपा करून असली राजकीय बदला घेण्याची भावना थांबवा. मुख्य सचिवांची बदली रद्द करा. राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अर्थ सचिव केंद्र सरकारच्या बैठकांना सतत हजर असतात. ते केंद्रासाठी काम करीत असतात. मग ते राज्य सरकारसाठी केव्हा काम करणार? त्यांची बदली करणे ही राजकीय सूडबुद्धी नव्हे काय??, असा सवालही ममता बॅनर्जींनी केला.
बंगालला माझे सर्वाधिक प्राधान्य आहे. मी त्यांच्या पाया पडायला तयार आहे. पण त्यांनी मुख्य सचिवांची बदलीची ऑर्डर रद्द करावी. केंद्र सरकारने सौजन्य दाखवावे. आम्हाला काम करू द्यावे. मी बंगालच्या सिक्युरिटी गार्डसारखे काम करीन, असे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले.