वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज होत असलेल्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात कुचबिहारमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोपांची प्रचंड धुमश्चक्री सुरू झाली असून कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता.Home Minister Amit Shah is completely responsible for today’s incident and he himself is the conspirator, accuses mamata banerjee
गृहमंत्री अमित शहांच्या निर्देशावर कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला, तर ममतांच्याच केंद्रीय दलांना घेरण्याच्या आवाहनामुळे हा हिंसाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आज कुचबिहारमध्ये मतदान होते. त्याच्या आचारसंहितेमुळे मी तेथे जाऊ शकले नाही. पण उद्या कुचबिहारमध्ये गोळीबाराविरुद्ध एक रॅली काढून घटनास्थळालाही भेट देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
सिलिगुडीत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, की कुचबिहारच्या सीताकुचली भागात झालेल्या गोळीबाराला अमित शहा हेच जबाबदार आहेत. नव्हे, त्यांनीच हा कट रचला आहे. मी केंद्रीय दलांना दोष देत नाही कारण ते गृहमंत्र्यांच्या आदेशाखाली काम करतात. मला खात्री आहे,
की कुचबिहारमधील गोळीबाराची घटना ही पूर्वनियोजित होती. मी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणार आहे. आम्ही गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
याच प्रकरणावरून भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी तृणमूळ काँग्रेसच्या केडरला केंद्रीय सुरक्षा दलांचा घेराव करण्याची चिथावणी दिली म्हणूनच कुचबिहारची गोळीबाराची घटना घडली असल्याचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करून या घटनेचा अहवाल थेट दिल्लीला मागून घेतला आहे. वेळ पडल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याचीही शक्यता आहे.