वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज एकमेकांवर तिखट वार आणि प्रहार करून घेतले. पण ते एकमेकांसमोर येऊन नव्हे, तर वेगवेगळ्या कार्यक्रमात…!! For some many years, UP has been viewed from a political lens, its prospects of playing a vital role in country’s development were not even discussed.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्य योजनेतील लाभार्थी व्यक्तींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांवर तिखट प्रहार केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की विरोधकांनी आत्तापर्यंत उत्तर प्रदेशला फक्त राजकीय चष्म्यातूनच बघितले. उत्तर प्रदेशमधल्या राजकारण्यांची देशावर नेतृत्व करण्याची इच्छा आणि आकांक्षा तिथले राजकीय संख्याबळ या दृष्टीनेच विरोधकांनी कायम राज्याच्या राजकारणाकडे बघितले. परंतु उत्तर प्रदेशामध्ये विकासाचे प्रचंड क्षमता आहे याकडे कायम त्यांनी दुर्लक्ष केले.
आता या क्षमतेचा वापर दोन्ही सरकारे चांगल्या पद्धतीने करून घेत आहेत. उत्तर प्रदेश विकासाच्या नव्या महामार्गावर वाटचाल करत आहे. विरोधक संसदेत आणि संसदेबाहेर गोंधळ घालत राहतात. पण त्यांनी कितीही गोंधळ घातला तरी ते उत्तर प्रदेश सारख्या राज्यांच्या विकासात अडथळे आणू शकत नाहीत. विकासाच्या मार्गावर उत्तर प्रदेश आगेकूच करतच राहील.
याच्या नेमके विपरीत खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट वार केला. पंतप्रधान मोदी विकासाच्या बाता मारतात. पण ते युवकांमध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीबद्दल अवाक्षरही उच्चारत नाहीत. 12 कोटी युवक आज बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्याबद्दल मोदी काहीही बोलत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
युवक काँग्रेसने रायसीना हिलवर आयोजित केलेल्या धरणे प्रदर्शनात राहुल गांधी बोलत होते. महागाईपासून पेगासस स्पायवेअरच्या हेरगिरी पर्यंत अनेक मुद्द्यांवर युवक काँग्रेसने मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना राहुल गांधी यांनी संबोधित केले. केंद्र सरकारवर त्यांनी प्रचंड टीका केली.
अशाप्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येता पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर तिखट वार आणि प्रहार करून घेतले.