वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीसह अनेक राज्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. परंतु आगामी चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Five days of rain in the country from tomorrow
महाराष्ट्रातही एकीकडे उन्हाळी वारे वाहू लागल्यामुळं तापमानाचा पाराही चांगलाच वर गेला आहे. घामाच्या धारांनी अनेकजण त्रस्त झाले आहेत एप्रिलमध्ये ही अवस्था, तर मे आणि जूनपर्यंत काय अवस्था होणार, अशा विवंचनेंत असणाऱ्यांना पाच दिवस पाऊस पडणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
- पाऊस दमदार पण पिके साधारण : ‘राजा’ तोच राहणार पण देशावर नैसर्गिक संकट येणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
चक्रिवादळसदृश वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ज्यामुळं देशाच्या दक्षिण- पश्चिम भागात पुढील पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाही बरसू शकतो.
14-16 एप्रिलदरम्यान, तामिळनाडूच्या दक्षिण भागात आणि किनारपट्टी भागात, केरळ आणि कर्नाटकच्याही किनारी भागात जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय दक्षिण- पश्चिम मध्य प्रदेश आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातही वादळी वाऱ्यांचे झोत जाणवू शकतात. ज्यामुळं मध्य प्रदेश, महाराष्ट्रात विदर्भ पट्टा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांमध्ये पुढील 4-5 दिवसांत पर्जन्यमानाचा अंदाज आहे.
उत्तर भागात गारपिटीचा अंदाज
हिमालय क्षेत्रात येणाऱ्या राज्यांमध्येही 14-17 एप्रिल या काळात पावसाचा अंदाज आहे, तर मैदानी भागात 15-17 एप्रिलला जोरदार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बल्तिस्तान, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेश या भागांत 14-17 एप्रिल या काळात गारपीटीची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली असून, इथं धुळीचे लोटही उठू शकतात असं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्रात अवकाळीचं संकट
महाराष्ट्रामध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी जोरदार पावसानं हजेरी लावली. मंगळवारपासूनच सिंधुदुर्गसह राज्यातील तुरळक भागांत पावसानं हजेरी लावली होती. ज्यानंतर मराठवाडा, विदर्भाकडेही पावसानं मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. आज पुणे, सोलापूरच्या काही भागात जोरदार पावसाने वादळासह हजेरी लावली. अवकाळी पावसामुळं शेतमाल, फळांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.