काँग्रेस, तृणमूळ, द्रमूक शेतकरी प्रश्नावर राष्ट्रपतींना भेटायला एकत्र आलेच नाहीत
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांची ऐक्य साधण्यासाठी पाच दिवस दिल्लीत तळ ठोकून बसल्या होत्या. पण त्यांनी दिल्लीतून कोलकात्याकडे कूच केल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांच्या एकजुटीचे पितळ उघडे पडले. Congress, TMC & DMK to raise issues together. But it is sad that no one has bothered to show up today.
त्याचे झाले असे… शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रपतींना भेटून निवेदन देण्यासाठी पुढाकार घेतला अकाली दलाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी. त्यांना मायावतींचा बहुजन समाज पक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनीच साथ दिली. त्यांच्या नेत्यांसह त्या राष्ट्रपतींना भेटून निवेदन देऊन आल्या.
पण त्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी हरसिमरत कौर बादल यांनी सोनिया – राहुल गांधी यांची काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस आणि एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमूक या पक्षांशी संपर्क साधला होता. या तीनही पक्षांच्या नेत्यांना त्यांनी आपल्या समवेत राष्ट्रपतींना भेटण्याची विनंती केली होती. परंतु, यापैकी कोणत्याही पक्षाच्या नेता त्यांच्या समवेत राष्ट्रपती भवनात गेला नाही.
हे दुर्दैवी आहे, की काँग्रेस, तृणमूळ काँग्रेस आणि द्रमूक या पक्षांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे महत्त्व वाटत नाही. विरोधी पक्षांना हे पक्ष साथ देत नाहीत. विरोधी पक्षांची एकजूट होत नाही तोपर्यंत याचा फायदा भाजप घेत राहील, असा इशारा हरसिमरत कौर बादल यांनी दिला.