अयोध्येतील पत्रकारपरिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल!
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्येत शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व मंत्री, आमदार व नेत्यांसह प्रभू रामाचं दर्शन घेतलं, महाआरती केली. याशिवाय राम मंदिर निर्माण कार्याचीही पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच, शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका टिप्पणी करणाऱ्या विरोधकांची समाचार घेतला, उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray in a press conference in Ayodhya
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’मला माहीत आहे, मी समजूही शकतो की आमची अयोध्या यात्रा लाखो लोकांसाठी आनंददायी यात्रा आहे. परंतु काही लोक असे असतात त्यांना याचा त्रासही होतो. कार अनेक असे आहेत की त्यांना हिंदुत्वाचे वावडे राहिले आहे व आताही आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेकजण मुद्दाम हिंदुत्वाचा अपमान करत होते. अपप्रचार करत होते. परंतु मी तुम्हाला सांगेन हिंदुत्व ही एक जीवन प्रणाली आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे आमचे हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरेंनी देखील हिंदुत्वाबद्दलचे त्यांचे विचार सांगितले आहेत. आमचं हिंदुत्व अन्य धर्माचा अनादर करणारे नाही. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे आहे. परंतु काहींना असे वाटते की, हिंदुत्व प्रत्येकाच्या मनात, घरात पोहचलं तर आपले राजकीय दुकान बंद होईल. आपला कारभार ठप्प होईल, या भीतीपोटी स्वातंत्र्यानंतर सातत्याने अनेकजणांनी असा प्रयत्न केला आहे.’’
याचबरोबर, ‘’२०१४ मध्ये जे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात या देशात प्रस्थापित झाले. तेव्हा पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जागर झाला. मान,सन्मान झाला अभिमान वाढला. या अगोदर आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाबद्दलचे जे विचार होते, त्यांनी म्हटले होते की गर्वसे कहो हम हिंदू है..हा नारा बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे. शिवसेना आणि भाजपाची विचारधारा एक आहे. परंतु जाणुनबुजून जनतेला भरकटवण्यासाठी काही जणांकडून मतभेदाच्या चर्चा पसरवल्या जात आहेत. परंतु लोक आता समजदार आहेत.’’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
याशिवाय, ‘’२०१९ मध्ये लोकांच्या मनात जी गोष्ट होती, जो जनादेश होता की महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचं सरकार बनावं. कारण, आम्ही सोबत निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर लोकांची अपेक्षा होती की शिवेसना-भाजपाचं सरकार बनेल. परंतु स्वार्थापोटी आणि खुर्चीच्या लालसेपोटी चुकीचं पाऊल उचललं गेलं. पंरतु आम्ही लोकांनी आठ-नऊ महिन्यांपूर्वी हे सुधारलं. जी लोकांची अपेक्षा होती आम्ही तसे सरकार स्थापन केले. म्हणूनच जिथे जिथे आम्ही जातो लोकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते की त्यांना काय वाटत आहे. पूर्वी काही लोक म्हणायचे की पहिले मंदिर फिर सरकार. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना कायम दूर ठेवलं होतं, यांनी त्यांच्यासोबत सरकार तर बनवलं. मंदिरासाठी काहीच करू शकले नाहीत. परंतु मंदिर निर्माणासाठी पंतप्रधान मोदी सक्षम आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींनी केलं आहे. पहिले हेही म्हणत होते की मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे. परंतु मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली. मग खोटं कोण ठरलं?’’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.