केंद्रीय यंत्रणांच्या कथित गैरवापराविरोधातील याचिका फेटाळली गेल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील १४ विरोधी पक्षांची सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कथित गैरवापराविरोधातील याचिका फेटाळून लावली. यामुळे विरोधकांना मोठा झटका बसला आहे. देशातल्या सामान्य नागरिकांपेक्षा राजकारण्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे तयार करता येणार नाहीत, असे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावल्याने विरोधी पक्षांच्या वकिलांनी ही याचिका माघारी घेतली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून विशेषकरून भाजपाकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. BJP president Naddas first reaction after the Supreme Court rejected the opposition petition
‘’देशाच्या स्वतंत्र यंत्रणांवर वारंवार आरोप करण्याची विरोधकांना सवय आहे. विरोधी पक्षांच्या लोकांचे कारनामे संपूर्ण देश पाहत आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले असे सर्व लोक आज एका व्यासपीठावर येऊन खोट्या आरोपांचे राजकारण करत आहेत.आज सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी या सर्वांना आरसा दाखवणार आहे.’’ असं जेपी नड्डा यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
या याचिकेमध्ये प्रामुख्याने ईडी आणि सीबीआयला लक्ष्य करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने याचिका फेटाळताना विरोधी पक्षांना सुनावलं. “कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय फक्त राजकीय नेतेमंडळींसाठी आम्ही आदेश देऊ शकणार नाही. न्यायालयानं असं केल्यास ते कदाचित धोकादायक ठरू शकेल”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर सीबीआय आणि ईडीचा मनमानी वापर केल्याचा आरोप केला होता. या याचिकेमध्ये अटक, रिमांड आणि जामीन याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली होती. हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सुनावणी घेण्यास नकार दिल्याने अखेर विरोधकांना माघार घ्यावी लागली आहे. विरोधी पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. ईडी, सीबीआयने 885 फिर्यादी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी 23 मध्ये दोष सिद्ध झाले आहेत. अशा स्थितीत 2004 ते 2014 या कालावधीत जवळपास निम्म्याहून अधिक तपास हे अपूर्णच राहिले आहेत.