विशेष प्रतिनिधी
मुंबई : वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. SINDHUTAI SAPKAL: Maharashtra lost a mother today: Devendra Fadnavis
मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्या गेलेल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. अनेक संस्था त्यांनी उभारल्या. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान आहे. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या, हे अधिक स्मरणात आहे.
त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. पद्मश्री पुरस्कार, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे, याची आज प्रकर्षाने आठवण होते आहे. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस (Devendfra Fadnavis) यांनी व्यक्त केल्या आहेत.
नाथांची माय’ असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.