मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकाच जिल्ह्यातील असण्याची पहिलीच वेळ
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. एवढच नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली, तर त्याच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी आठ आमदारांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. Sharad Pawar gave Jitendra Awhad the responsibility of promoting the Nationalist Congress Party and the post of opposition leader
या घडामोडीमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला आता नव्या नेत्यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपावावी लागली. परिणामी शरद पवारांनी पक्ष प्रतोदपदी आणि विरोधी पक्षनेते पदी आपल्या निष्ठावान असलेल्या जितेंद्र आव्हाडांना संधी दिली आहे.
अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद होते. मात्र अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. तर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे या पदावरही राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांनाच संधी दिली आहे.
अशाप्रकारे दोन्ही महत्त्वाची पदं आता जिंतेद्र आव्हाडांकडे आली आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पद आणि विरोधी पक्षनेते पद ही दोन्ही मुख्य पद ठाणे जिल्ह्यालाच मिळाली आहे. विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. त्यांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपदी निवड केली आहे. मी जे व्हीप काढेल ते त्यांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले आहे.