विशेष प्रतिनिधी
मुंबई – दिल्लीत हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे…, अशी पोस्टर सोशल मीडियावर झळकवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सगळ्या मराठी केंद्रीय मंत्र्यांची निंदानालस्ती केली आहे. MPCC targets all marathi central ministers, “brand” them as “maharashtradrohi”
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हॅंडलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे पाटील, संजय धोत्रे या केंद्रीय मंत्र्यांची बदनामी करण्यात आली आहे.
…आणि या निंदानालस्ती आणि बदनामीचे कारण काय तर या केंद्रीय मंत्र्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नेमकेपणाने ठाकरे – पवार सरकारच्या अपयशावर बोट ठेवले हे. याच कारणाने प्रदेश काँग्रेसने या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रद्रोही ठरविले आहे. पियूष गोयल आणि प्रकाश जावडेकरांनी औषध पुरवठ्यावरून ठाकरे – पवार सरकारचे आकड्यानिशी वाभाडे काढले आहेत. महाराष्ट्राला ऑक्सिजनपासून ते रेमडेसिवीरपर्यंत सगळ्या औषध आणि सुविधांच्या पुरवठ्यात सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे त्यांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केले आहे.
त्यावर चिडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने शिवसेनेची भाषा उसनी घेत मराठी मंत्र्यांवर दुगाण्या झोडल्या आहे.
ज्या पियूष गोयलांवर काँग्रेसने महाराष्ट्र द्रोहाचा शिक्का मारला आहे, त्याच पियूष गोयल यांनी नुकतीच ऑक्सिजन पुरवठ्याबाबत बैठक घेऊन १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निश्चिक केल्याचे स्पष्ट केले आहे.
याखेरीज ऑक्सिजनची वाहतूक सुविधा रेल्वेने द्यावी, ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मागणी देखील त्यांनी मान्य केली आहे. आणि काँग्रेस त्यांच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा शिक्का मारते आहे.