विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्याचा विपरीत परिणाम रुग्णाबरोबर नागरिकांना भोगावा लागत आहे. एकूणच कोरोनाने जीवन संथ केले असून पुण्यात सर्वच ठिकाणी वेटिंगवर नागरिकांना राहावे लागत आहे. अशीच परिस्थिती काहीशा फरकाने देशात आणि राज्यात सर्वत्र आहे. Life slow due to corona
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गर्दी कमी होण्याची गरज आहे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला. पुण्यात दोन दिवसांचा शनिवार आणि रविवार हा संपूर्ण कडक लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे जीवन ठप्प झाले आहे. ते सध्या तरी आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. एकंदरीत अनेक गोष्टी 4 -5 जी च्या जमान्यात संथ झाल्या आहेत.
दुकानात, रुग्णालयात जावे तर रांग आहे.
बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका, औषधांची दुकाने आणि अंत्यसंस्कारासाठीही रांग आणि वेटिंगची वेळ आली आहे. एका क्लिकवर सर्व जग हातात असलेल्या जनतेला ही रांग आणि वेटिंगचा अनुभव तसा नवा आहे. अर्थात गेल्या वर्षभरापूर्वीचा अनुभव गाठीशी असल्याने रांग ही जीवनशैलीचा भाग बनली आहे. त्या रांगेला आपल्या देशात एकेकाळी काडीचीही किंमत नव्हती. शारीरिक कष्टाची सवय तर केव्हाच मोडली आहे. त्यामुळे रांगेत उभे राहणेही जीवावर येते आहे. त्यामुळे वैताग वाढतो.त्यातून चिडचिड आणि संताप उफाळून येत आहे.
दुसरीकडे पूर्वी सर्व एका क्लिकवर मिळत होत. आता तसे होत नाही. आरोग्य सांभाळायचे की रोजगार या दुविधेत मनुष्य सापडला आहे. त्यामुळे तो मनस्वास्थ्यही गमावून बसला असून त्याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर होत आहे. नोकऱ्या गमावलेल्याची परिस्थिती त्याहून गंभीर आहे. रोजगाराची चिंता करायची की आरोग्याची हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
मध्यमवर्गीय वाऱ्यावर
गरिबांची चिंता सरकार करते आहे. श्रीमंतांची चिंता करायची सरकारला गरज नाही. उरले ते मध्यमवर्गीय जे लोकसंख्येत अधिक असून त्यांची सरकारला चिंता नाही. ते वाऱ्यावर आहेत. ते प्रामाणिकपणे कर भरतात, गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल कितीही वाढले तरी निमूटपणे खरेदी करतात. निवडणूक आली की, मतदान करायला प्रामाणिकपणे जातात. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी आणि पक्ष यांचे निवडणुकीसाठी काढलेले जाहीरनामे आणि वचननामे काटेकोरपणे वाचतात. निवडणुकीनंतर जनता आणि पक्ष जाहीरनामे, वचननामे सवयीप्रमाणे विसरून जातात. एकमेकाविरोधात निवडणूक लढविणारी मंडळी गुण्यागोविंदाने एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. त्यामुळे जाहिरनामे, वचननामे राबविण्याची गरज नसते. कारण ते किमान समान कार्यक्रमात विरघळतात. मग, खरा सुरु होतो खेळ. काका काय म्हणाले, बाबा काय म्हणाले. तुम्ही काय म्हणाला, ते काय म्हणाले.
समाजात राजकीय मनोरंजनाचा एकच धुरळा उडतो. जनता त्याचा आनंद घेते. राजकीय उखाळ्या पाखाळ्यात छान दिवस जातात. पटले नाही तर पाच वर्षांनी वचपा काढते. मग, अचानक कोरोना, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती आली की, त्याबाबत सरकारने पूर्वतयारी केलेली नसते. त्यामुळे वादळ आल्यावर शहामृग जसा वाळूत तोंड खुपसून बसतो. त्या प्रमाणे सरकार हतबल होऊन बसते. वादळ सरल्यावर शहामृग तोंड बाहेर काढतो. तेव्हा सर्व काही संपलेले असते.