विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या मदतीला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील धावून आले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, असा सवाल जलील यांनी केली आहे.Imtiaz Jalil asks why Sharad Pawar did not show readiness to meet PM after Nawab Malik was jailed
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेऊन, संजय राऊत यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचं मोदींना म्हटलं आहे. त्यानंतत या भेटीवरून एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना शरद पवारांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला आहे.
जलील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक होऊन तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही? नवाब मलिक यांच्याबद्दल काहीही चर्चा न केल्याने तुमच्या मंत्र्याने काही चूक केली असे तुम्हाला वाटते? याचा अर्थ आपल्याला नवाब मलिक यांच्यापेक्षा संजय राऊत हे अधिक महत्वाचे वाटतात का?
राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना वेग आला असतानाच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली. भेटीदरम्यान संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचं पवारांनी मोदींसमोर मुद्दा मांडला. पवार म्हणाले की, मी केवळ एका पत्रकारावरील कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी बोललो.
ते पत्रकार म्हणजे संजय राऊत. खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली. ईडीने संजय राऊत यांचा मुंबईतील फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमिनीवर टाच आणली आहे. या गोष्टीची मी पंतप्रधानांना माहिती दिली. संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच ते एका वृत्तपत्राचे संपादकही आहेत, असे मी पंतप्रधानांना सांगितले.