मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे शिवसेना युतीत सडली, अशी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, असा टोला फडणवीसांना लगावला आहे. Before your party was born, we had a corporator in Mumbai, Devendra Fadnavis Answers To Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे शिवसेना युतीत सडली, अशी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, असा टोला फडणवीसांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर पाहायला मिळाला. 25 वर्षे युतीत सडलो, असे ते म्हणतात. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का, असा सवाल आमच्या मनात येतो.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, तुमची सिलेक्टिव्ह विसरण्याची पद्धत आहे. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. 1984 मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. फडणवीस पुढे म्हणाले की, भाजपसोबत लढलो असं सांगताना, हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले. याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं.
ते पुढे म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दवडली. कोण होते तुम्ही. राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात तयार होत आहे राम मंदिर. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय, असा सवाल त्यांनी केला. आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे!, अशी टीकाही फडणवीसांनी केली.