विशेष प्रतिनिधी
मुंबई : “टाटा’मध्ये कोणाही व्यक्तीपेक्षा मोठी अशी संचालक मंडळाची निर्णयप्रणाली लागू करणे हे माझे ध्येय होते. या माझ्या प्रयत्नांबाबत माझे अंतःकरण आजही स्वच्छ आहे, असे विधान उद्योजक सायरस मिस्त्री यांनी केले आहे.Syrus mistri wrote emotional letter
मिस्त्री यांचा “टाटा सन्स’च्या अध्यक्ष पदावरील दावा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यावर मिस्त्री यांनी एका पत्राद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.”टाटा’च्या सर्वांगीण हितासाठी, भागधारकांची मते कंपनीच्या धोरणांमध्ये उमटावीत तसेच संचालकांना भीती वा प्रभाव बाजूला सारून काम करता यावे, हे माझे उद्दिष्ट होते.
टाटामधील नेतृत्वबदल मी अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकलो असतो का, हे तपासून पाहताना जाणवले की कदाचित माझ्यात काही कमतरता असू शकतील. मात्र, मी स्वीकारलेल्या मार्गाबद्दल, माझ्या प्रयत्नांबद्दल व त्यांच्या यशस्वितेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, असेही या पत्रात म्हटले आहे.
न्यायालयाकडून सर्वांनाच अपेक्षा असतात, आमच्या प्रकरणाबद्दल न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मी निराश झालो आहे. आता मी “टाटा समुहा’च्या कामकाजावर थेट प्रभाव पाडू शकणार नाही. मात्र, मी बदल होण्याच्या हेतूने ज्या तत्त्वांसाठी लढलो, त्यांचा प्रभाव अजूनही सर्वांवर पडेल. माझे अंतःकरण स्वच्छ असल्याचेही मिस्त्री यांनी शेवटी नमूद केले आहे.