नाशिक : सत्तेवर शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे पुत्र मंत्री आहेत. पण सत्ता सगळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या हातात एकवटल्याचे चित्र दिसतेय. त्याने शिवसेना नेत्यांच्या अस्वस्थतेची खदखद प्रचंड वाढली आहे. तिचे ज्वालामुखी रूपांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत. Shiv sena MLAs are disturbed due to suppression by NCP and congress ministers
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी, विजय शिवतारे, दिलीप लांडे, माजी खासदार अनंत गीते, आमदार आशिष जयस्वाल अशी यादी प्रचंड वाढत चालली आहे. नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या अर्थ मंत्रालयाकडून मतदारसंघासाठी निधी न मिळण्यापासून ते नगरपालिकांमध्ये सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांकडून शिवसेनेची कोंडी होण्यापर्यंत असंख्य तक्रारींची माळ आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांविरुद्ध तक्रारींच्या फाईली तयार आहेत.
दररोज एका पेक्षा एक तोफा भाजपवर डागण्याऐवजी राष्ट्रवादीवर डागण्यासाठी शिवसेनेचे एकापाठोपाठ एक आमदार तयार आहेत. फक्त मुख्यमंत्री आपले आहेत म्हणून ते गप्प आहेत. पण तरीही त्यांची अस्वस्थता बाहेर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी जितेंद्र आव्हाडांवर कोविड काळात तोफा डागून घेतल्या. विजय शिवतारे यांनी बारामतीकरांवर तोफा डागून घेतल्या. शिवसेनेची सत्ता शिवसेनेसारखी राबवा अन्यथा ते आपल्याला गिळून टाकतील, असा इशारा देऊन घेतला. ईडीच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा शिवसेना नेतृत्वाला सल्ला दिला.
या सगळ्यात वरकडी केली, ती माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले शिवसेनेचे मित्र होऊ शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे हेच आमचे एकमेव गुरू आहेत. जाणता राजा म्हणवून घेणारे शरद पवार आमचे गुरु होऊ शकत नाहीत. कोणत्याही स्थितीत होणार नाहीत, अशा कठोर शब्दांमध्ये अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर प्रहार केला. आमदार आशीष जयस्वाल यांनी त्याच्याही पुढे जाऊन काँग्रेसवाल्यांना कुत्रेही विचारत नव्हते. काँग्रेस मेली होती पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जिवंत केले, अशी विधाने करून घेतली.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना नेत्यांची सुरुवातीपासूनची भाषा नीट अभ्यासली तर त्यांची किती प्रचंड कोंडी झाली आहे ते समजते. अशी कोंडी झाल्यामुळे, आक्रमकता दाबली गेल्यामुळे ते आता उघडपणे बोलू लागले आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर त्यांचा प्रचंड रोष आहे. नावाला सत्ता असून चालत नाही तर ती शिवसेना स्टाईलने राबवावी लागते असेच ते नेतृत्वाला आता स्पष्टपणे सुनावत आहेत. आज पाच – सात आमदार आणि एक माजी खासदार बोलले आहेत.
शिवसेनेचे 56 आमदार आहेत. ही यादी अशीच थांबणार नाही. ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जसजशी कोंडी करेल तसतशी ही अस्वस्थता वाढून तिचे मला ज्वालामुखीत रूपांतर होण्याची शक्यता आहे. याची दखल आज ना उद्या शिवसेना नेतृत्वाला घ्यावी लागेल, असेच शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
Shiv sena MLAs are disturbed due to suppression by NCP and congress ministers
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान सरकारचा नवा जाचक फतवा, आता काबूल विद्यापीठात महिलांना प्रवेश नाही
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : तुमचा मोबाईल करा अवघ्या तीस सेंकदात चार्ज
- “पीठामध्ये मीठाएवढा भ्रष्टाचार चालतो” ; बसपाच्या आमदार रामबाई सिंह यांचा अजब तर्क
- कन्हैय्या कुमार एक नंबरचा स्वार्थी; माकपचे सरचिटणीस डी. राजा यांचे जोरदार टीकास्त्र