प्रतिनिधी
मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर ते ओबीसी आरक्षण या विषयावर शिवसेना ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सकाळी – दुपारी केलेले आरोप सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून एका सुरात फेटाळून लावले. Shinde Fadnavis dismissed Thackeray group-NCP’s morning-afternoon allegations in the evening
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्दबादल ठरवला अशी बातमी सकाळी आली. त्या मुद्द्यावरून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हे सरकार हिंदुत्ववादी नाही, असे म्हणून घेरले. हे सरकार औरंगजेबाचे नातेवाईक आहे, असा टोलाही त्यांनी लगावल्याच्या बातम्या आल्या. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या हेतू बद्दलही शंका उपस्थित केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमके कोण??, माईक माईक खेचणे, चिठ्ठी लिहिणे या मुद्द्यावरून शिंदे फडणवीसांना घेरले.
मात्र सायंकाळ होता होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना चोख प्रत्युत्तरे दिली. मूळातच बहुमत गमावल्यानंतर ठाकरे – पवार सरकारने अखेरच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा निर्णय घेतला होता. तो बेकायदा होता. त्यामुळे उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार नामांतराचा निर्णय घेईल, असे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुळात ज्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही तेच बोलतात याचे आश्चर्य वाटते. बांठिया आयोगाने 27 % राजकीय आरक्षण मान्य केलेच आहे. ते कोर्टात पेशही केले आहे. परंतु, ज्यांना ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही ते असे खुसपटी मुद्दे काढतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. सकाळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेले आरोप सायंकाळ होता होता शिंदे आणि फडणवीस यांनी फेटाळून लावले.