• Download App
    मराठा - ओबीसी संघर्षासाठी शरद पवारच जबाबदार; उदयनराजेंचा पुराव्यासकट घणाघात!! Sharad Pawar is responsible for Maratha-OBC conflict says udayanaje

    मराठा – ओबीसी संघर्षासाठी शरद पवारच जबाबदार; उदयनराजेंचा पुराव्यासकट घणाघात!!

    विशेष प्रतिनिधी

    वाई : महाराष्ट्रात आज जो मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे, त्याचे मूळ 23 मार्च 1994 च्या अध्यादेशामध्ये आहे. त्या वेळी जातीच्या मतांचे राजकारण करून शरद पवार यांनी जो चुकीचा निर्णय घेतला, त्याने आज जाती – जातींमधली तेढ वाढली, अशी घणाघाती टीका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. पण आता हा संघर्ष थांबवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करत त्यांच्या सद्यस्थितीनुसार प्रत्येकाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली. Sharad Pawar is responsible for Maratha-OBC conflict says udayanaje

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कोरेगाव येथे आयोजित आभार मेळाव्यात उदयनराजे बोलत होते. सध्या राज्यात सर्वत्र पेटलेल्या मराठा आणि ओबीसी संघर्षांचा संदर्भ देत उदयनराजे यांनी याला राजकीय हेतूने इतिहासात घेतलेले निर्णय जबाबदार असल्याचा आरोप केला. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दोषी ठरवत उदयनराजे म्हणाले, की आजच्या या वादाचे मूळ २३ मार्च १९९४ रोजी काढलेल्या अध्यादेशात आहे. त्या वेळी या जातीच्या राजकारणाचा फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी चुकीचे निर्णय घेतले. त्या निर्णयाचा फटका आज मराठा आणि ओबीसी या दोन्हीही वर्गातील गरिबांना बसत आहे. यानंतरही अनेक राजकारण्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. गेल्या अनेक वर्षांच्या कृत्यांमुळेच महाराष्ट्रातील जातीय स्थिती अशी स्फोटक झाली आहे. ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांकडून त्या वेळी योग्य निर्णय घेतले असते, तर महाराष्ट्राची आजची सामाजिक स्थिती अशी झाली नसती. आता हे सर्व नेते सध्या सोयीस्कर शांत असून, महायुतीच्या सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत, असा प्रहार उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर केला. पण आता हा संघर्ष थांबवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करत प्रत्येकाच्या सद्यस्थितीनुसार त्या – त्या जातीला आरक्षण द्यावे, अशी भूमिका उदयनराजे यांनी या वेळी मांडली.

    यावेळी आमदार महेश शिंदे, भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, सुनील काटकर, राहुल बर्गे, सेवागिरी ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, राहुल पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

    – बालेकिल्ल्याच्या वल्गना सातारकरांनी खोडल्या

    लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्याचे राजकारण स्पष्ट झाले आहे. हा जिल्हा कुणाला त्यांचा बालेकिल्ला वाटत होता. अनेक नेते तशा वल्गना करत होते. मात्र आता या निकालाने ते चित्र खोडून टाकले. मी आजवर कधीही कायम राजकारण केले नाही. मात्र आता यापुढे मी आणि शिवेंद्रसिंहराजे यात लक्ष घालणार आहोत. बालेकिल्ला म्हणणाऱ्यांना, गटबाजीचे राजकारण करणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणार आहोत, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.

    Sharad Pawar is responsible for Maratha-OBC conflict says udayanaje

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Neelam Gorhe : पालघर अत्याचार प्रकरणात न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू; ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक व शैक्षणिक मदत मिळणार- डॉ. नीलम गोऱ्हे

    Uday Samant : भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द; मंत्री उदय सामंत यांची माहिती; राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची करण्यात आली होती सक्ती

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा; विधानसभेवर निवड झाल्याने सोडली खासदारकी