विशेष प्रतिनिधी
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सामनातून आज थेट शरद पवारांना निशाण्यावर घेतले आहे. शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर परखड भाष्य केले आहे, पण ते भाष्य जरी शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर असले, तरी सामनाच्या अग्रलेखातून पवारांना दिलेले उत्तर खरेतर त्यांच्या विस्तारित आत्मचरित्रातील मांडलेल्या मुद्द्याच्या रागातून आले आहे.Sharad Pawar – balasaheb Thackeray political heir, success and unsuccess!!
पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा त्यांच्या विस्तारित आत्मचरित्रात परखडपणे नमूद केल्या, इतकेच नाही तर त्याच्या “निवडक वेचक” बातम्या त्यांनी मराठी माध्यमातून छापूनही आणल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. पण आपण महाविकास आघाडी तुटेल, असे काही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी त्यावेळी उत्तर देण्याचे टाळले होते. पण आज पवारांच्या राष्ट्रीय ते महाराष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचे तोकडेपणच ठाकरे – राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून दाखविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा शेंडा – बुडखा आणि बुंधा सर्वकाही महाराष्ट्रातच आहे. पवार राष्ट्रीय नेते असले आणि त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र राष्ट्रवादीचे सर्व जे काही हवे आहे, ते महाराष्ट्रातच हवे आहे, असे सामनाने पवारांना सुनावले आहे. हा “साक्षात्कार” सामनाला अडीच वर्षांचे सरकार चालू असताना झाला नव्हता. तो सरकार पडून 9 महिने उलटून गेल्यानंतर लगेच झाला आहे.
अर्थात हेही खरेच, की काहीही जन्माला यावे लागायला 9 महिने उलटावे लागतात ना!! सामनाकारांचे तसेच झाले आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार कोसळून 9 महिने उलटल्यानंतर त्यांच्या पोटातून “सत्याचा जन्म” झाला आहे. त्याआधी ते “सत्य” त्यांच्या पोटात दडले होते. ते आता बाहेर आले आहे.
पवारांना आपला राजकीय वारसदार तयार करता आला नाही, ही वस्तुस्थिती सामनाने मांडली आहे. पवार वारस तयार करण्यात अपयशी ठरले हे तर खरेच, पण त्याचबरोबर त्या वारसाच्या भविष्यातील अपयशाचा ठपका त्यांनी आपल्या छातीवर झेलला आहे. ही वस्तुस्थिती सामनाने मांडलेली नाही.
सुप्रियांचे “राहुल गांधी” होणे टळले
सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्ष सोपवून जर 2024 च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला अपयश आले असते, तर त्यांच्या पक्ष नेतृत्वाची सुरुवातच मुळी “अपयशी कार्याध्यक्ष” अथवा अध्यक्ष अशा ठपक्याने झाली असती. थोडक्यात त्यांचा “राहुल गांधी” झाला असता. सुप्रिया सुळेंचे असे “राहुल गांधी” होऊ देणे शरद पवारांनी आपल्या निर्णयातून टाळले आहे. हे सामनाकरांना दिसले नाही!!
जैविक वारस विरुद्ध वैचारिक वारस
पण मुद्दा त्या पलीकडचा देखील आहे. पवार जर पक्ष सांभाळणारा वारस निर्माण करण्यात अपयशी ठरले असतील, तर बाळासाहेब ठाकरे हे तर तसा वारस निर्माण करण्यात अपयशी ठरले नव्हते ना… मग त्यांनी नेमलेल्या राजकीय वारसाने असे कोणते दिवे लावले??, कोणती मशाल पाजळली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र “प्रकाशमान” झाला?? असे सामनागारांना वाटते!!
भाजपने शिवसेना फोडली ही वस्तुस्थितीच आहे. पण कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षाचा घात करूनच मोठा होतो, ही तर त्याहून मोठी वस्तुस्थिती आहे. प्रश्न समोरचा आपले घर फोडायला आला असा नुसता आरडाओरडा आणि बभ्रा करून संपत नाही, तर आपले घर वाचविण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्याच्या संरक्षणाची – बांधबंधिस्तीची खबरदारी आपणाच घ्यायला पाहिजे. तशी क्षमता आपल्यातच निर्माण करायला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी बाळासाहेबांनी शिवसेनेच्या नेतृत्वपदी बसविलेल्या जैविक वारस पेलू शकला का?? हा खरा प्रश्न आहे!!
उलट बाळासाहेबांनी शिवसेनेत नेमलेले जैविक वारस स्वतःचा पक्ष टिकवण्यात अपयशी ठरले पण त्यांचे वैचारिक मात्र वारस मात्र बाळासाहेबांच्याच विचारांचा हिंदुत्वाचा झेंडा पुढे घेऊन चालले आहेत, असे दिसते ना!!
इतकेच नाही तर ज्या पक्षाला सामनाकरांनी अग्रलेखातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या फुटीला जबाबदार धरले आहे, त्या भाजपला देखील महाराष्ट्रात नाईलाजाने का होईना, पण बाळासाहेबांच्याच हिंदुत्वाचा वारसा सांगावा लागत आहे. इतकेच नाही तर बाळासाहेबांचे हिंदुत्व सावरकरांच्या प्रखर हिंदुत्वाशी जोडून घ्यावे लागत आहे.
म्हणजे शरद पवार केवळ पक्ष चालविणाराच वारसा निर्माण करण्यात अपयशी ठरले असे नाही, तर वैचारिक वारसाही तयार करण्यात पवारांना अपयश आले आहे आणि तिथे बाळासाहेबच यशस्वी ठरले आहेत. हे सत्य मात्र सामनाकरांनी “सिलेक्टिवली” पुढे आणलेले नाही किंवा सध्याच्या सामनाकरांच्या पोटाच्या आकारानुसार फक्त “लिमिटेड सत्य” त्यात दडले होते, ते बाहेर आले आहे, असे म्हणावे लागेल!!
Sharad Pawar – balasaheb Thackeray political heir, success and unsuccess!!
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना