प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज त्यांची तब्येत खालावली असून त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे तसेच त्यांचे डोके आणि हातपाय दुखत आहेत. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला होता. परंतु संभाजी राजांनी तो नाकारला आहे. Sambhavi raje not well thackeray pawar govt
आता जर संभाजी राजे यांना काही झाले तरी त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारची असेल असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजे यांच्या समवेत आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घेऊन दिला आहे.
ही पत्रकार परिषद संभाजी राजे यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून लाईव्ह करण्यात आली.
संभाजीराजे यांच्या पाच प्रमुख मागण्या या फक्त राज्य सरकारच्या आखत्यारितल्या आहेत. त्यामुळे त्या मान्यच केल्या पाहिजेत. त्या मागण्यांशी कोर्टाचा काहीही संबंध नाही असेही या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. संभाजी राजे यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना जर कोणत्याही प्रकारचा आणखी त्रास झाला आणि पुढे काही वेगळे घडले तर त्यासाठी संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा निर्वाणीचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
उद्यापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलने करण्यात येतील. पण समाजाला वेठीस धरण्याची संभाजीराजे यांची इच्छा नाही. राज्य सरकारने ताबडतोब संभाजी राजे यांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात. आज शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि महापौर किशोरी पेडणेकर संभाजीराजे यांना भेटून गेले आहेत. पाच – सहा तासात निर्णय घेऊ, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. परंतु, अद्याप सरकारकडून काही पावले उचलण्यात आली नाहीत, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.