वृत्तसंस्था
पुणे : शहरातील दांडेकर पुलाच्या जवळच्या आंबिल ओढा परिसरातील वस्तीतील अतिक्रमणे हटविण्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली होती. परंतु नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे महापालिकेच्या न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. Postponement of action to remove encroachments in Ambil Odha area of Pune
हनुमंत फडके यांनी कारवाईच्या विरोधात महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीची सुनावणी झाली. पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान सुरू झालेला नागरिक व प्रशासन यांच्यातला तीव्र संघर्ष तात्पुरता संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारवाईला विरोध करणाऱ्या १०० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात झाली होती.
आंबील ओढ्याजवळच्या वस्तीत महापालिकेचा वतीने अतिक्रमण कारवाई केली आहे. या परिसरात पूर येऊ नये म्हणून आंबील ओढ्याची लांबी- रुंदी वाढण्याचे काम केले जात आहे. तसेच पुराचा फटका बसू नये यासाठी ओढ्यालागत भिंत देखील बांधली जात आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जात आहे.
मात्र आज सकाळपासून या कारवाईला विरोध करण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोध करणाऱ्याना ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. जे नागरिक विरोध करत होते अशा १०० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापुढे जे विरोध करतील त्यांचावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले होते. यानंतर आता कारवाईला सुरुवात करत घरे पाडायला सुरुवात झाली .दरम्यान, या सर्व लोकांची राहण्याची सोय ट्रान्झिट कॅम्पमध्ये सोय केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अखेर न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रहिवाशांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण…?
कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ती जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार असा दावा करत नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.