विशेष प्रतिनिधी
बीड – विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांच्या वेळी बंधू धनंजय मुंडे यांना सांभाळून घेणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी बीडमधल्या कोरोना स्थितीवरून ठाकरे – पवार सरकारला घेरले आहे. त्याला वेगवेगळी ट्विट करून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पण एकूण बऱ्याच दिवसांनी मुंडे बंधू – भगिनी बीडच्या राजकारणात आमने – सामने आलेले दिसत आहेत. pankaja and dhnanjay munde throws solvos at each other over corona pandamic situation in beed dist.
पंकजा मुंडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. यात धनंजय मुंडे यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली आहे. या पत्रात पंकजा मुंडे म्हणतात, की “रेमडेसिवीरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती आहे, की जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या २ लाखांपैकी बीडलाही पुरेशा लसी मिळाली पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे टीकास्त्र पंकजांनी धनंजय मुंडे यांच्यावर डागले आहे.
एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे, याकडे पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
धनंजय मुंडे यांचे प्रत्युत्तर
पंकजा मुंडे यांच्या टीकेला ट्विट करून धनंजय मुंडे यांनी काही वेळातच प्रत्युत्तर दिले आहे. यात ते म्हणतात, की ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे. लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
“जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० आणि कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत आणि कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत,’ असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
मुंडे बंधू – भगिनींच्या या पत्र आणि ट्विटर वादात बीडमधील परिस्थिती सुधारत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.