विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोल्हापूरच्या पूरग्रस्त दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले. दुसऱ्यादिवशी नागपूरच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरींवर कौतुकाची फुले उधळली. Now spat between CM uddhav Thackeray and Devendra fadanavis emerged
पण शनिवार – रविवार भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई होत आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्यासंबंधी म्हणजे शिवसेना पक्ष फोडण्यासंबंधी विधान केले होते. त्याला शिवसेनेतून संजय राऊत, आमदार राजन साळवी यांनी “कडक” उत्तर दिले. पण त्यावर “वरकडी” केली, मुख्यमंत्र्यांनी…!!
मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या शुभारंभ कार्यक्रमात “थपडांची” भाषा वापरली. आम्ही राजकारणात जेवढ्या थपडा खाल्ल्यात त्याच्या दुप्पट दिल्यात, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावर एक व्हिडिओ काढून खुलासा केला आहे. त्यांनी त्या वक्तव्यापासून माघार घेतली आहे. त्यामुळे आमच्यासाठी तो विषय संपला आहे, पण अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.
पण एवढेच बोलून फडणवीस थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, की पण कोणी अंगावर आल्यावर आम्ही त्याला सोडणार नाही. फडणवीसांच्या या वक्तव्यातून भाजपा देखील शिवसेना आक्रमक झाली तर तितकाच आक्रमक राहील, असे संकेत राजकीय वर्तुळत गेले आहेत. याचा अर्थ कोल्हापूर आणि नागपूर इथल्या कार्यक्रमांमध्ये निर्माण झालेले थोडे राजकीय सौहार्द प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर आणि शिवसेनेने त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया नंतर संपले, असे दिसून आले. उलट दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष्यांमध्ये शाब्दिक चकमक वाढल्याचे स्पष्ट झाले.