विशेष प्रतिनिधी
पुणे : विरोधी पक्ष असेल तरच लोकशाही टिकून राहील. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष राहायला हवा. त्यामुळे काँग्रेस बळकट व्हायला हवी, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पराभवानंतरही विजय असतो असा मंत्रही त्यांनी दिला.Nitin Gadkari expects Congress to be strong, to be an opposition party for democracy
पुण्यात एका मुलाखतीत गडकरी बोलत होते. लोकशाही बद्दल काय वाटते? या प्रश्नावर गडकरी म्हणाले, विरोधी पक्ष असेल तर लोकशाही राहील. राजकारणात विचारांच्या आधारावर मतभिन्नता असते. पण आपण शत्रू नाही. वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत.
ती परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशी विचारधारा कधीच अपेक्षित नाही. सर्वांनी विचारधारेशी प्रामाणिक राहायला हवे. भिन्नतेपेक्षा शून्यता ही खरी समस्या आहे.भाजप- शिवसेनेचा पूल बांधणार का? या प्रश्नावर गडकरी म्हणाले जे बांधायचे कॉन्ट्रॅक्ट असते तेच बांधायचे असते. मी फक्त नॅशनल हायवे बांधतो. महाराष्ट्राचे कंत्राट माझ्याकडे नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, ज्या वेळी केंद्रात जाण्याची इच्छा नव्हती त्यावेळी राष्ट्रीय राजकारणात गेलो. आता तेथे सुखी आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. क्षमतेपेक्षा मला खूप चांगल्या संधी मिळाल्या. त्यानुसार मी काम करत राहिलो.