• Download App
    ठाकरे - फडणवीस "बंद दाराआडच्या चर्चा" ही मीडियाची "लावालावी"; नारायण राणेंनी सटकावले |Narayan Rane targets media over closed door meeting of CM Uddhav Thackeray - Devendra Fadanavis

    ठाकरे – फडणवीस “बंद दाराआडच्या चर्चा” ही मीडियाची “लावालावी”; नारायण राणेंनी सटकावले

    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : ओबीसी राजकीय आरक्षणा बाबतीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआडच्या चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Narayan Rane targets media over closed door meeting of CM Uddhav Thackeray – Devendra Fadanavis

    “बंद दाराआडच्या चर्चा” ही तुमची “लावालावी” आहे. अशा लावालाव्या करू नका, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मीडियाला खडसावले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही वक्तव्याचा त्यांनी यावेळी समाचार घेतला.



    जन आशीर्वाद यात्रेच्या अखेरच्या दिवशी ते सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे म्हणाले, की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली ही मीडियाची भाषा आहे. असल्या लावालाव्या मीडिया करतो, त्या बंद करा. कोणी कोणाला भेटले तर मला काही फरक पडत नाही. उलट मी आता जास्त सुरू झालो आहे. मवाळपणा माझ्या राशीत नाही, अशा तिखट शब्दांमध्ये नारायण राणे यांनी मीडियाला फटकारले.

    नारायण राणे यांच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम खात्याला निधी कितीचा मिळतो? जो निधी दिला आहे तो गडकरी साहेबांनी दिला आहे. त्यातून कामे सुरू आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात नारायण राणे यांची खिल्ली उडविली होती. त्याला आज नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. राणे म्हणाले, की अजित पवार अजून अज्ञानी आहेत.

    माझ्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयातून निधी मिळतो. प्रधानमंत्री योजना यांच्यासाठी पंतप्रधान निधी देतात. एकूण साडेचार लाख कोटी रुपयांचा निधी या खात्याला मिळतो. त्यातले तीन लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. सव्वा लाख कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातून देखील कामे सुरू आहेत.

    ठाकरे – पवार सरकारच्या काळातील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे नारायण राणे यांनी वाभाडे काढले. ते म्हणाले, की पूरग्रस्तांना मदत करायला या सरकारकडे एक रुपया नाही. जाहीर केलेले पैसे ते शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देत नाहीत. तिजोरीत यांच्या काळात खडखडाट झाला आहे.

    सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटी कामगारांचे पगार हे देत नाहीत म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागत आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असा प्रतिटोला नारायण राणे यांनी लगावला.

    Narayan Rane targets media over closed door meeting of CM Uddhav Thackeray – Devendra Fadanavis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!