विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूरसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना बरोबरच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा पैलू जोडला गेला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा गेमचेंजर प्रकल्प आहे आणि यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावे जोडले गेले आहे. Gadkari, Shinde, Fadanavis are new architects of infrastructure development in maharashtra
आत्तापर्यंत महाराष्ट्राचा विकास म्हटला की तो पश्चिम महाराष्ट्र केंद्रीत असायचा. त्यातही तो साखरपट्ट्याचा असायचा. तिथल्याच नेत्यांना अनेक वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार म्हटले गेले. पण त्यांचाच काळात मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाचा फार मोठा अनुशेष तयार झाला ही वस्तुस्थिती आहे.
पण आता मात्र विकासाचे हे परिमाण गडकरी, शिंदे आणि फडणवीस या त्रिकूटाने बदलले आहे. समृद्धी महामार्गाच्या रूपाने केवळ मुंबई आणि नागपूरलाच एकमेकांशी जोडले नसून संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांच्या कनेक्टिव्हिटीची मजबूत साखळी तयार झाली आहे आणि हा संपूर्ण महामार्ग कृषी आधारित अर्थव्यवस्थेला नुसती संजीवनी देणारा ठरणार नसून तिच्या समृद्धीत वाढ करणारा असणार आहे.
आत्तापर्यंत नितीन गडकरींना रोडकरी म्हटले जायचे. गडकरी जिथे जातील तिथे रस्ता तयार होतो असे म्हटले जायचे. बाळासाहेब ठाकरे त्यांना पूलकरी म्हणायचे. कारण महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबईत 55 उड्डाण पूलांचे जाळे उभारले. इतकेच नाही तर त्यांच्याच कारकिर्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील पूर्ण झाला आहे. त्यामुळे गडकरींचे नाव महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या रस्ते बांधण्याशी जोडले गेले आहे.
आता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भर पडली आहे. या दोन्ही नेत्यांनी आजच्या आपल्या भाषणात समृद्धी महामार्गात कोणी, कसे अडथळे आणले आणि आपण ते कसे दूर केले गेले याचे विस्तृत वर्णन केले. समृद्धी महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचा विरोध होता. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका त्या विरोधात होती. त्याचबरोबर फडणवीसांनी उल्लेख केल्याप्रमाणे एकनाथ शिंदे ज्या पक्षात होते, त्या शिवसेनेचा देखील याला सुरुवातीला विरोध होता. त्यांनी गावागावांमध्ये जाऊन या प्रकल्पासाठी जमिनी देऊ नका असा प्रचार चालवला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावांच्या बैठका घेतल्या आणि जमीन संपादनातले अडथळे दूर केले. याचा उल्लेख फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.
समृद्धी महामार्ग एकूण 703 किलोमीटरचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पूर्व टोकापासून पश्चिम टोकाच्या मुंबईला जोडले गेले आहे. एका अर्थाने हा महाराष्ट्रव्यापी महामार्ग तयार झाला आहे आणि त्याला अनेक मार्ग जोडलेही जाणार आहेत. याचा उल्लेख गडकरींनी आजच्या भाषणात केल्या महाराष्ट्रातून विविध राज्यातून महाराष्ट्राच्या मार्गे जाणाऱ्या 7 राष्ट्रीय महामार्गांचा उल्लेख गडकरींनी केला. या महामार्गांचे काम सध्या वेगात सुरू असून येत्या 2 वर्षांमध्ये हे महामार्ग केंद्रातल्या मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारच्या कालावधीतच पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुंबई – पुणे एक्सप्रेस वे आणि नंतर समृद्धी महामार्ग बांधण्याचे आव्हान गडकरी, शिंदे आणि फडणवीस उभारण्याचे मोठे आव्हान यांनी पेलले. स्थानिकांचा विरोध, पर्यावरणाचा मुद्दा, रस्ता बांधताना अनेकांनी आणलेले अडथळे त्यांनी पार केले.
नागपूर ते शिर्डी हा पहिल्या टप्प्यातील मार्ग आजपासून खुला झाला. शिर्डीपासून पुढे भिवंडीपर्यंत महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या नवीन रस्त्याचे सारे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांनी मुंबई – नागपूर या नवीन रस्त्याची कल्पना मांडून त्याचे नियोजन केले. रस्त्याची आखणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग किती उपयुक्त ठरतो याचा आज सामान्यांना अनुभव येतो. तेव्हाही पुणे महामार्ग बांधताना गडकरींना अनेकांनी नावे ठेवली होती. तसेच समृद्धी महामार्गाबाबत तसेच झाले. फडणवीसांनी साऱ्यांशी चर्चा करून विरोध मावळण्यावर भर दिला. भूसंपादन ही मोठी समस्या होती. पण रस्ते विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन तसेच विविध यंत्रणांच्या सहकार्याने या रस्त्याचे काम मार्गी लागले. राज्यात सत्ताबदल झाल्यावर फडणवीस यांच्या हाती तसे अधिकार नव्हते. पण समृद्धी महामार्ग मार्गी लागेल यावर त्यांचे सारे लक्ष होते. महाविकास आघाडी सरकारला वारंवार ते या संदर्भात सूचनाही करीत होते. नितीन गडकरी यांना मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाचे सारे श्रेय जाते, तसेच भविष्यात नागपूर ते मुंबई बाळासाहे ठाकरे समृद्धी महामार्गासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जोडले जाईल.
रस्ते विकासाच्या क्षेत्रात गडकरी आणि फडणवीस या दोन नागपूरकरांनी आपली नावे कायमची कोरली आहेत. इतकेच नव्हे तर ही विकासगंगा या दोन्ही नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या पलिकडे नेऊन दाखवली आहे.
Gadkari, Shinde, Fadanavis are new architects of infrastructure development in maharashtra
महत्वाच्या बातम्या