विशेष प्रतिनिधी
मुंबई : “कुटुंब रंगले राजकारणात” अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना आपले कुटुंब सांभाळाता येत नाही, ते महाराष्ट्र काय संभाळणार?? असा असा सवाल केला. त्यावर चिडलेल्या पवारांनी मोदींच्या कुटुंबाची स्थिती चिंताजनक असल्याचा वार केला, पण त्यावर महाराष्ट्र भाजपने पवार नावाच्या सरड्याची कुंपणापर्यंतच धाव असल्याचा पलटवार केला.BJP targets sharad pawar over his remarks on Modi parivar
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. ते कौटुंबिक भांडणामुळे फुटले. पुत्र मोह आणि कन्या मोह ही त्याची कारणे असल्याचा प्रहार पंतप्रधान मोदींनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत केला होता. ज्या शरद पवारांना आपले कुटुंब सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार??, असे जनतेला वाटत असल्याचे मोदी म्हणाले होते.
मोदींच्या या वक्तव्यावर चिडलेल्या पवारांनी खुद्द मोदींचेच कुटुंब सध्या चिंताजनक अवस्थेत आहे, म्हणजे देश चिंताजनक अवस्थेत आहे, असे वक्तव्य केले. कारण मोदींना स्वतःचा परिवार नाही. त्यामुळे ते देशालाच आपला परिवार मानतात.
शरद पवारांच्या या टीकेवर महाराष्ट्र भाजपने त्यांच्यावर पलटवार केला. सरड्याची धाव कुंपणापर्यंत कारण पवारांना “हम दो हमारी एक”, याशिवाय दुसरे काही दिसतच नाही, असे शरसंधान भाजपने साधले.
भाजपने केलेले ट्विट असे :
सरड्याची धाव कुंपणापर्यंत
#शरदचंद्रजी_पवार लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच कुटुंब तुमच्या विचारांच्या कक्षेबाहेरचं आहे. १४० कोटी जनता हेच मोदीजींचं कुटुंब आहे. सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि गेली १० वर्ष कुटुंबप्रमुख म्हणून ते फक्त आपलं कर्तव्यच बजावत नाही, तर त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या कुटुंबाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
शरद पवारजी तुमचा कुटुंबवत्सलपणा उभ्या महाराष्ट्रानं पाहिला. ‘हम दो आणि हमारी एक’ म्हणत तुम्ही पुतण्याचं कर्तृत्वपण नाकरलं होतं. त्यामुळे तुम्ही म्हणतात तशी मोदीजींच्या कुटुंबियांची स्थिती चिंताजनक नाहीच. उलटपक्षी आता मोदीजींचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सक्षम होतेय… आत्मनिर्भर होतेय. त्यामुळे काळजी नसावी… #ModiKaPariwar #AbkiBar400Par #PhirEkBaarModiSarkar