प्रतिनिधी
अकोला – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना एसटीचे खासगीकरण हवेच आहे… तेव्हा सावधान राहा, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.All parties want privatization, warns Prakash Ambedkar
एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला दिला आहे. सरकार कोणतेही असो, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या सगळ्या पक्षांना एसटी खासगीकरण पाहिजेच आहे. त्या सर्वांचे तसे प्रयत्न चालू आहे. त्यांना ती संधी एसटी कर्मचाऱ्यांनी मिळू देता कामा नये, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
-मी बोलू नेमके कोणाशी… अनिल परब
एसटी संप मिटविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी कराचा फॉर्म्यूला सांगितला आहे, त्यावर महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. तो फॉर्म्युला आम्ही गांभीर्याने घेतला आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
अर्थात फडणवीसांनी सांगितलेला फॉर्म्युला अमलात आणणे कोरोनापूर्व काळात शक्य होते. आता खूप मोठा गॅप पडला आहे. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
अनिल परब पुढे म्हणाले, की एसटीच्या विलिनीकरणाच्या निर्णयावर समिती निर्णय घेईल. पण चर्चा नेमकी कुणाशी करायची? एसटी कर्मचारी ना युनियनचे ऐकत ना भाजप नेत्यांचे. हे आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे. कामगारांनी सांगावे कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करत आहे. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातो. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. त्यापेक्षा त्यांनी चर्चा करावी, असेही परब म्हणाले.