राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून शहराला वार्यावर सोडले आहे. गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी पुण्यात येऊन केवळ दोन बैठका घेतल्या आहेत, अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून शहराला वार्यावर सोडले आहे. गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी पुण्यात येऊन केवळ दोन बैठका घेतल्या आहेत, अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
मुळीक म्हणाले, पालक मंत्र्यांनी पुण्याला वार्यावर सोडले आहे. अधिकार्यांना ते निर्देश देत असतील याची सुतराम शक्यता नाही, अन्यथा अधिकार्यांनी काढलेल्या आदेशांमध्ये एकवाक्यता दिसली असती.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सात आयएएस अधिकारी नियुक्त आहेत, परंतु त्यांच्या जबाबदार्या निश्चित केलेल्या नाहीत. अधिकार्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुणेकरांमध्ये असुरक्षितता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयाच्या (ससून सर्वोपचार रुग्णालय) अधिक्षकांची बदली केल्यानंतर तिथे पूर्णवेळ अधिक्षक नियुक्त केलेला नाही. त्यामुळे अजूनही ससूनमधील कोरोनाची स्थितीत कोणताही बदल झालेला नसून, ती अधिक गंभीर होत आहे, असे सांगुन मुळीक म्हणाले, रेशनिंग दुकानातील शिधावाटप वितरण प्रक्रियेतील गोंधळ वाढला असून, अजूनही नागरिकांना धान्य उपलब्ध होत नाही.
बांधकाम मजूरांना जाहीर केलेले अर्थसहाय मिळालेले नाही. दारूची दुकाने खुली केल्यामुळे याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे त्यामुळे प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.