- डॉ. हर्षवर्धन ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष
चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटाविरुध्द भारत सरकार ज्या नेटाने लढत आहे, याचे कौतुक संपूर्ण जगाला वाटत आहे. तब्बल 132 कोटी लोकसंख्येचा देश असूनही भारतात बाधित आणि मृत्यू इतर अनेक प्रगत देशांच्या तुलनेत कमी कसे, याचे आश्चर्य जगाला आहे. संकटाशी सामना करण्याच्या याच कणखर भारतीय वृत्तीचा फायदा आता जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) जागतिक स्तरावर होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटाविरुध्द लढण्यात अग्रभागी असलेले केंद्रीय आरोग्य मंत्री जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. डॉ. हर्ष वर्धन २२ मे पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारताच्या प्रस्तावावर १९४ देशांनी सह्या केल्या आहेत. गेल्याच वर्षी दक्षिण पूर्व अशिया गटातील देशांनी निर्णय घेतला होता की या वर्षी ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भारताचे असतील. या बोर्डाची वर्षातून दोन वेळा बैठक होते. जागतिक आरोग्य संघटनेचे धोरण बनविण्यात अध्यक्षाची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे चीनी व्हायरसच्या संकटात ही जबाबदारी मिळणे भारतासाठी भूषणावह आहे.
सोमवारीच डॉ. हर्ष वर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले होते. या वेळी बोलताना ते म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यास कोणतीही कसर राहू नये म्हणून वेळेवर, सक्रीय आणि श्रेणीबद्ध प्रतिक्रिया सुनिश्चित केल्या. भारताने वेळेवर योग्य ती पावले उचलली. आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी २० लाखांहून अधिक मनुष्यबळ उभे केले.
या वेळी संपूर्ण मानवजातीने एकत्र आले पाहिजे. सर्व सरकारे, उद्योग आणि मानव सौहार्द जपणार्या लोकांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण जगाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करावा. यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक स्त्रोत्रांचा वापर करावा. आपल्या काही सदस्य देशांमधील आर्थिक आणि तांत्रिक पोकळी भरून काढण्यासाठी आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले होते.