मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन, मुंबई येथे ‘प्राकृतिक कृषी संमेलन 2025’ झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती शाश्वत शेतीकडे नेणारी एक सर्वसमावेशक दृष्टी आहे. रासायनिक खतांसह बियाणांचा अतिवापर जमिनीची सुपीकता कमी करत आहे, त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांवर संकट येत आहे. अशा स्थितीत नैसर्गिक शेती ही निसर्गाशी सुसंगत आणि नफा वाढवणारी दिशा ठरते. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकाचा उपयोग करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास साधता येतो.