नाशिक : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपच्या निलंबित बारा आमदारांची बाजू उचलून धरल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. त्याच वेळी अजित पवार यांनी शिस्तपालनाबद्दल सर्वपक्षीय आमदारांना चांगलेच सुनावले. याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये जोरदार आल्या.Where is Ajit Dada Selective class
“अजित पावलांनी घेतला आमदारांचा क्लास”, “अजित पवारांनी आमदारांना झापले” वगैरे शीर्षके देऊन या बातम्या प्रसार माध्यमांनी रंगवल्या. अजित पवारांनी आपल्या भाषणात मांडलेले मुद्दे योग्यच होते. आमदारांनी शिस्त पाळली पाहिजे. अध्यक्षांना पाठ दाखवता कामा नये. विधानसभा आणि विधान परिषद सदनातील वरिष्ठ, ज्येष्ठ मंत्र्यांचा, सदस्यांचा मान राखला पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. अजित पवारांनी मधुकरराव चौधरी यांचे दिलेली उदाहरणही योग्यच आहे.
पण त्यापलिकडे नेमकेपणाने पाहिले तर प्रत्यक्षात हा अजित पवारांचा हा “निवडक वेचक” असा क्लास होता. अजित पवारांनी आमदारांना झापताना आपल्याला दोन – दोन लाख लोक मते देतात म्हणून आपण निवडून येतो. आपण कुत्री, मांजरी, कोंबड्या यांचे प्रतिनिधित्व करत नाही, असे शेलके शब्द वापरले आहेत. हे शब्द वापरण्यामागचे नेमके इंगित काय आहे…??
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विधिमंडळाच्या पायर्यांवर येताना बघताच म्याऊं म्याऊं असा आवाज काढला. त्यादिवशी तो विषय तेवढ्यापुरता गाजला स्वतः आदित्य ठाकरे यांनी तर त्याकडे दुर्लक्ष करून तो विषय राजकीयदृष्ट्या मारून टाकला होता. परंतु नितेश राणेंनी आवाज काढून 24 तास उलटून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी कुरापत काढत कोंबड्याच्या अंगाला मांजराचे तोंड चिकटवत माॅर्फ केलेला फोटो आपल्या ट्विटर हॅण्डल वर शेअर केला. त्याला वरती “पहचान कौन?”, अशी कॅप्शन दिली. नितेश राणे आणि नारायण राणे यांना ङिवचण्याचा हा प्रकार होता. म्हणजे जो विषय आदित्य ठाकरे यांनी सोडून दिला होता तो विषय नवाब मलिक आणि पुन्हा उकरून काढून आदित्य ठाकरे आणि राणे यांना एकाच वेळी टोचून घेतले. हा विषय देखील उलटून संपून दोन दिवस उलटले आहेत.
त्यानंतर आज विधानसभेमध्ये आमदारांना झापताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा म्याऊं म्याऊंचा विषय काढत आपण कुत्रे, मांजरी, कोंबड्यांचे प्रतिनिधी नाही, असे सुनावून घेतले. हे नितेश राणे यांना सुनावणे आहेच, पण त्याचबरोबर नवाब मलिक यांना देखील सुनावणे आहे. त्यापलिकडे जाऊन अजितदादांनी जो विषय आदित्य ठाकरे यांनी राजकीय दृष्ट्या मारून टाकला होता तो विषय आमदारांचा “निवडक वेचक” क्लास घेऊन पुन्हा उकरून काढला आहे. शिवसेनेला आणि राणे कुटुंबियांना जो विषय नको आहे, तो विषय पुन्हा उकरून काढण्याचे हे विशिष्ट कसब राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अंगीकारले आहे…!!