नाशिक : लोकसभा निवडणुकीत नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये कमी पडल्याचा भाजपला फटका बसला. महाराष्ट्रातले सत्ता समीकरण बिघडले. या सगळ्यात मराठी माध्यमांचे “मॅनेजमेंट” पवारांच्या राष्ट्रवादीने साधून घेतल्याने माध्यमांनी पवारांच्या मुत्सद्देगिरीचा बोलबाला चालवत ठेवला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीचा नॅरेटिव्ह उभा केला. पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा फायदा काँग्रेसचा झाला. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात चौथ्या नंबर वरून एकदम पहिल्या क्रमांकावर आला. आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला त्याचा अधिक लाभ दिसायला सुरवात झाली आहे. काँग्रेस कडे इच्छुकांनी गर्दी केली आहे. 1400 + leaders and workers demand candidature from Congress
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या मराठी माध्यमांच्या रिपोर्टिंग मध्ये पवार + ठाकरे यांचा बोलबाला आहे. पवार पश्चिम महाराष्ट्रात कसे डाव टाकतायेत, कशा खेळ्या करतायेत, अजितदादांचे राष्ट्रवादी आणि भाजप यांना पवार कसे पोखरून काढतायेत याच्या बातम्यांची मराठी माध्यमांमध्ये भरमार आहे. पण प्रत्यक्षात पवारांचे सगळे डाव पश्चिम महाराष्ट्रात, त्यातही सोलापूर – कोल्हापूर जिल्ह्या पुरतेच मर्यादित आहेत. इतरत्र खेळायला पवारांना त्यांच्या कर्तृत्वाचीच मर्यादा आहे. फक्त मराठी माध्यमांनी पवारांच्या मुत्सद्देगिरीची बेसुमार भलामण चालवली आहे. प्रत्यक्षात पवारांकडे दुसऱ्या ऑप्शन नसल्याने त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनच उमेदवार आपल्या राष्ट्रवादीत खेचून घ्यावे लागत आहेत. ते 10 – 5 उमेदवार भाजपकडून खेचून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. त्या पलीकडे पवारांच्या राष्ट्रवादीत ना उमेदवारीसाठी गर्दी आहे, ना प्रचारासाठी कोणी पुढे आले आहे. पवारांच्या राजकीय मर्यादांचे हे लक्षण आहे. फक्त ते मराठी माध्यमे उघडपणे सांगत नाहीत.
काँग्रेसची ताकद वाढली
त्या उलट जमिनी स्तरावर काँग्रेसची संघटना आता इतकी मजबूत व्हायला लागली आहे, की काँग्रेसकडे इच्छुकांची एकदम गर्दी वाढली आहे. 2019 मध्ये काँग्रेसची राजकीय अवस्था तोळामासा असताना काँग्रेसकडे फक्त 476 इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली होती. त्यावर 2024 मध्ये परिस्थिती एवढी बदलली आहे, की काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या एकदम चौपट वाढली आहे. काँग्रेसकडे 1400 पेक्षा अधिक इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसच्या वाढत्या ताकद आणि क्षमतेचे हे लक्षण दिसून येत आहे.
महापालिका + झेडपी साठीही ताकदवान उमेदवार
विधानसभेला तिकिटे मागणाऱ्या 1400 पैकी 90 % इच्छुकांची काँग्रेसमध्ये निराशा होणार हे उघड आहे, पण ही निराशा फक्त विधानसभा निवडणुकीपूर्वी मर्यादित आहे. कारण कुठलेही इच्छुक निवडणुकीमध्ये आपल्या राजकीय ताकतीपेक्षा वरच्या स्तराचे तिकीट मागतात आणि प्रत्यक्षात स्वतःच्या विशिष्ट स्तराच्या निवडणुकीची तयारी त्यातून करत असतात. काँग्रेसकडे 1400 + उमेदवारांनी इच्छुकांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे, याचा अर्थ काँग्रेसकडे निवडणूकक्षम म्हणजे निवडणूक लढवण्याची क्षमता असणाऱ्या अशा नेत्यांची संख्या वाढली आहे, की ज्यांनी विधानसभेपेक्षा खालच्या स्तराची म्हणजे महापालिका अथवा जिल्हा परिषद स्तराची निवडणूक लढवण्याची क्षमता निर्माण करून ती निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. केंद्रापासून जिल्हा – तालुकास्तरापर्यंत काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढल्याची ही खूण आहे, जी पवारांच्या “माध्यमी मुत्सद्दी” नॅरेटिव्ह पेक्षा कितीतरी मोठी आहे!!
भविष्यातली टक्कर भाजप – काँग्रेसमध्येच
या सगळ्याचा खरा अर्थ हा की, एकीकडे भाजपची सत्तेची आणि संघटनेची ताकद, दुसरीकडे काँग्रेसची केंद्रीय स्तरापासून जिल्हा तालुकास्तरापर्यंतची वाढती ताकद यातून महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही वर्षांमध्ये दोन प्रबळ राष्ट्रीय पक्षांमध्ये टक्कर होऊन तोकड्या राजकीय ताकदीच्या प्रादेशिकांना धक्का खावा लागणार आहे. त्यात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी त्यांच्या “अस्तित्वासकट” किंवा “नास्तित्वासकट” असणार आहेत, हे उघड राजकीय गुपित सध्या पडद्याआड दिसत आहे!! म्हणजे दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांपासून वेगळ्या राहिल्या किंवा एकमेकांमध्ये विलीन झाल्या, तरी दोन राष्ट्रीय पक्षांच्या टकरीत त्यांची ताकद कुचंबणारच आहे.
1400 + leaders and workers demand candidature from Congress
महत्वाच्या बातम्या
- Rajnath Singh : ‘स्वातंत्र्यानंतर महिलांना देशाच्या विकासात योगदान देण्यापासून वंचित ठेवण्यात आले’
- PM Kisan Nidhi : ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान निधीची रक्कम परत करावी लागणार!
- S Jaishankars : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे पाकिस्तानवर परखड भाष्य, म्हणाले…
- Arabian Sea Cyclone : अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा कच्छवर परिणाम, घरे रिकामी करण्याचे आदेश, 75 किमी प्रतितास वेगाने वाहणार वारे