Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.