दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅससमोर उभे राहून ते तापवावे लागते. अन्यथा ते उतू जाते. तेच पाण्याच्या बाबतीच होत नाही. पाणी उकळायला ठेवले तर एक वेळ ते आटून जाईल पण उतू जात नाही. अशा वेळी दूधच उतू का जातं, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. चहात दूध टाकण्याआधी ते उतू जात नाही. Why milk get overflow when it boils
पाण्याचं आधण ठेवल्यावर चहा पावडर, साखर टाकल्यावर पाणी उकळताना पाण्याचे गरम रेणू हलके असल्याकारणाने वर येतात व बुडबुडय़ातील वाफ बाहेर टाकली जाते आणि राहिलेला द्रव पदार्थ परत पाण्यात मिसळला जातो म्हणून चहाचं पाणी उतू जात नाही, मग दूध टाकल्यावर नेमके असे काय घडते?
तर जेव्हा आपण दूध तापवतो तेव्हा त्यातील प्रथिने व स्निग्ध दुधापासून वेगळे होतात व हलके असल्याने दुधाच्या वर जमा होतात व थर तयार करतात म्हणजेच दुधावर साय जमा होते. दूध गरम होत असताना त्यातील पाण्याची वाफ तयार होते व ही वाफ सायीच्या वरच्या थरात अडकते. दूध तापत असताना ही वाफ प्रसरण पावते व अधिक वाफ जमा होत असल्याकारणाने सायीच्या थराला वर ढकलते व दूध उतू जाते. दूध उतू जाऊ नये म्हणून या अडकलेल्या वाफेला बाहेर पडू देण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यायला लागतो.
बासुंदी बनवताना दूध आटवण्यासाठी ठेवताना हेच केले जाते. त्यासाठी काही जण दुधाच्या पातेल्यात स्टीलचा चमचा ठेवतात. चमच्याद्वारे दुधातील वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो व सायीखाली वाफ अडकत नाही व दूध उतू जात नाही किंवा उतू जाणाऱ्या दुधावर पाण्याचा शिडकावा करावा जेणे करून वाफेचे रूपांतर पुन्हा द्रवात रूपांतर होते व वरील पृष्ठभागात तापमान देखील कमी होते.