मुलांना शिस्त लावायची, तर शिक्षा अपरिहार्य ठरते का याचा पालकांनी नेहमी विचार केलाच पाहिजे. मुलांना वेळीच शिस्त न लावल्यास ती बिघडतात आणि शिस्त काही आपोआप लागत नसते, त्यासाठी शिक्षा हवीच, असं अनेक पालक मानतात. मुलांच्या मेंदूची मशागत फार योग्यप्रकारे व हळुवारपणे करावी लागते. त्यासाठी सतत त्याच्यावल शिस्तीचा बडगा चालवून फारसा उपयोग नसतो.Train children’s brains properly and gently
मानसतज्ज्ञ डॉ. जिनो यांच्या मते शिक्षा केल्यानं काहीच साध्य होत नसतं. शिक्षेचा उद्देश असतो, की मुलाला केलेल्या चुकीबद्दल वाईट वाटावं आणि ती चूक कशी दुरुस्त करावी, याचा त्यानं विचार करावा. प्रत्यक्षात होतं उलटंच. झालेल्या शिक्षेचा आपण बदला कसा घ्यावा, हाच विचार मुलांच्या मनात येतो. म्हणजे शिक्षेचा हेतूच सफल होत नाही. शिक्षा करून मुलाचं वागणं बदलता येतं; पण त्याच्या वर्तनातला बदल हा योग्य दिशेनं होतोच असं नाही. गृहपाठ केला नाही म्हणून मुलाला शिक्षा केल्यास तो मुकाट्यानं गृहपाठ करू लागंलही.
पण त्याला अभ्यासाची आवड निर्माण होईल, ही शक्ययता किती. किंबहुना शिक्षेमुळं अभ्यासाची गोडी निर्माण होण्याऐवजी काहीशी अढीच निर्माण होते. शिस्त आणि शिक्षा यांची तुलना अशी केली आहे. चांगल्या शिस्तीमुळं मूल योग्य वागणूक शिकते, तर शिक्षेमुळं मुलांचं त्रासदायक, नकोसं वर्तन तात्पुरतं थांबतं. शिस्तीच्या, पण मोकळ्या वातावरणात सकारात्मक सुधारणा होतात; तर शिक्षा ही नेहमीच मुलांच्या मनात नकार, भीती निर्माण करते. शिस्त आत्मनियंत्रणाला मदत करते. तर शिक्षेमुळं विशेषतः अतिशिक्षेमुळं मुलं भ्याड बनतात, वाईट वर्तन करायला प्रवृत्त होतात.
कौतुक आणि प्रोत्साहनानं शिस्त निर्माण करण्यास मदत होते. शिक्षा मात्र केवळ दुःख आणि असमाधानकारक वातावरण निर्माण करते. शिस्त जबाबदारी शिकवते. तर शिक्षा मुलांच्या मनात राग निर्माण करते. शिस्तीमुळं आत्मप्रतिष्ठा वाढते. शिक्षेमुळं आत्मप्रतिष्ठा विकसितच होत नाही. शिस्तशीर वर्तनानं हित साधलं जातं. शिक्षेमुळं इतरांना फसवण्याची वृत्ती वाढते. मुलांना शिक्षा न करता शिस्त कशी लागेल, हे पाहायला हवं. घरात प्रत्येकानं स्वयंशिस्तीचं वातावरण राखल्यास मुलांमध्येही आपोआपच स्वयंशिस्त येईल.