• Download App
    "छद्मबुद्धी"चे सनदी सेवेनंतरचे उसासे...!!| "Pseudo-intelligence" sighs after the chartered service

    “छद्मबुद्धी”चे सनदी सेवेनंतरचे उसासे…!!

    कादंबरी लिहिली… समीक्षकांनी महान म्हटले की त्यांना साहित्यिकाचा दर्जा प्राप्त होतो आणि मग ते मूळात कोणीही असले, अगदी मोठे सनदी अधिकारी असले तरी ते महान सरस्वती उपासक बनून समोरच्यावर “छद्मबुद्धीचे” उसासे टाकायला मोकळे होतात…!!”Pseudo-intelligence” sighs after the chartered service

    2022 उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी असेच “उसासे” आपल्या भाषणातून टाकले आहेत…!! त्यांना आपल्याच शेजारी बसलेली “उद्घाटक छद्मबुद्धी” दिसली नाही… पण गुजरात मधून जनमताचा आधार घेऊन दिल्लीत पोहोचलेली “छद्मबुद्धी” उदगीर मध्ये साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उभे राहून लगेच दिसली…!!



    अर्थात भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अविष्कार स्वातंत्र्याला अनुसरून आपले विचार व्यक्त करायला ते नक्की मोकळे आहेत. पण आपण आजही “मोकळे” आहोत, हेच त्यांना मूळात मान्य नाही. कारण त्यांनी वर्षानुवर्ष स्वीकारलेल्या विचारसरणीचे राज्यकर्ते आज गादीवर नाहीत…!! त्यामुळे त्यांनी दिलेला “मोकळेपणा” आज त्यांना अनुभवता येत नाही…!!

    पण तरी देखील उपलब्ध “मोकळेपणातून”च त्यांनी दिल्लीत बसलेल्या “छद्मबुद्धीला” आपल्या भाषणातून छेदून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशीच “छद्मबुद्धी” आपल्याच शेजारी बसून मतस्वातंत्र्याविषयी उसासे टाकत होती ती अध्यक्षांना दिसली नाही…!! याच “छद्मबुद्धी”ने महाराष्ट्राच्या जनतेचा कौल धुडकावला आणि आपल्याला कौल नसताना देखील सरकार बनवले, हे मूळातले सनदी अधिकारी असलेल्या भारत सासणे यांना दिसले नाही…!! असो ज्याची त्याची “सद्बुद्धी” आणि ज्याची त्याची “छद्मबुद्धी”…!!

    अध्यक्षीय भाषणात भारत सासणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना नाव घेतले नाही, पण त्यांना “विदुषक” म्हणून घेतले पण हेच विदुषक जनमताच्या आधाराने दिल्लीत जाऊन राज्य करत आहेत हे मात्र त्यांना सहन झालेले दिसत नाही. आपण ज्या राजवटीखाली वर्षानुवर्षे सनदी अधिकारी म्हणून वावरलो तीच राजवट कशी गोड – गुलाबी होती हेच त्यांना माहिती आहे आणि त्यातूनच सध्याच्या राज्यकर्त्यांवर आपण अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा उद्घोष करत शरसंधान साधतो आहोत होत हे ते मानत आहेत…!!

    सध्या म्हणे लक्ष्मीची उद्धट उपासना चालू आहे आणि सरस्वतीच्या उपासनेची हेळसांड होते आहे… पण हे सनदी अधिकारी सेवेत होते तेव्हा सरस्वतीच्या उपासनेला किती बरे सन्मान होता…?? गावागावात आणि शहराशहरात लक्ष्मीची उद्धट उपासना कोणा कोणाची चालू होती…?? कोणाच्या नावाने नगरे, विद्या संस्था, प्रतिष्ठाने, विद्यापीठे उभी राहत होती…?? तेव्हा या सनदी अधिकाऱ्यांना लक्ष्मीच्या उद्धट उपासनेतून सरस्वतीच्या उपासनेची हेळसांड दिसली नव्हती…!!

    पण आता जेव्हा आर्थिक सुधारणांचे लोण आणि फळे सामान्यातल्या सामान्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहेत, वर्षानुवर्षे विरोधी बाकांवर बसलेले सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने हे घडले आहे, हे या सनदी अधिकाऱ्यांना सहन होत नाहीये…!! त्यातून लक्ष्मीच्या उद्धट उपासनेचे आणि सरस्वतीच्या उपासनाच्या हेळसांडीचे “छद्मबुद्धी”चे उसासे बाहेर पडत आहेत…!!

    असेच उसासे बडोद्याच्या साहित्य संमेलनात याच सनदी अधिकाऱ्यांच्या पूर्वसुरी असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख नावाच्या सनदी अधिकाऱ्यांनी काढले होते. तेही असेच मोठे साहित्यिक होते. त्यांनी बडोद्याच्या साहित्य संमेलनातून, “राजा जागा हो” अशी हाळी घातली होती. पण ते जेव्हा सनदी अधिकारी म्हणून वावरत होते, तेव्हाच्या राजाकडे त्यांनी किती वेळा मान वर करून पाहिले होते…?? तेव्हाच्या राजाला त्यांनी कितीसे इशारे दिले होते…??, याचा जरा धांडोळा घेतला तर आज अविष्कार स्वातंत्र्यच्या नावाने “छद्मबुद्धी”चे उसासे टाकणाऱ्या या सनदी अधिकाऱ्यांचे
    पाय किती मातीचे आहेत…!! हे लक्षात येते.

    राज्यकर्त्यांचा लोखंडी पंजा वाईटच… मग तो कोणाचाही असो… पण “छद्मबुद्धी”चे उसाशांना फक्त सध्याच्या राज्यकर्त्यांचे पंजे लोखंडी वाटून टोचतात. ते त्यांना “राहूचे उपासक” असे संबोधतात. पण ते ज्या वेळी सनदी अधिकारी म्हणून प्रत्यक्ष नोकरीत वावरत होते त्यावेळचे राज्यकर्ते कोणाचे उपासक होते…?? त्यावेळच्या राज्यकर्त्यांचे पंजे कोणत्या धातूचे बनले होते…??, हे मात्र ते स्वतःच्या “छद्मबुद्धीत” दडवून ठेवतात…!! गोड – गुलाबी, शानदार, छानदार आणि कादंबरी लिहून कमावलेल्या भाषेतून समोरच्यावर शरसंधान जरूर साधता येते, पण त्यातले सत्य हे प्रखर असेल तरच ते समोरच्याला टोचते अन्यथा ते उलटून आपल्याच अंगावर येऊ शकतात हे “सद्बुद्धी”चे सनदी अधिकारी साहित्यिक विसरलेले दिसतात.

    …आणि त्यातूनच 50 वर्षांची संसदीय कारकीर्द गाजवल्याची टिमकी मिरवणारी “प्रत्यक्ष छद्मबुद्धी” शेजारी बसली असताना सनदी अधिकारी साहित्यिकांना दिल्लीत सातच वर्षांपूर्वी जनमताच्या आधारावर जाऊन बसलेली कथित “छद्मबुद्धी” दिसली आहे…

    “Pseudo-intelligence” sighs after the chartered service

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!