आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची जेवढी काळजी घेतो, त्यापेक्षा मेंदूची अधिक काळजी घ्यायला हवी. आपण आनंदी, मोकळ्या वातावरणात राहिलो तर साहजिकच आपल्याला बरं वाटतं.Produce pleasant hormones in the body
पण जर वातावरण कंटाळवाणं असेल तर मनावर-मेंदूवर ओझं येतं. एखाद्याच्या सहवासात अर्धा तासही नकोसा वाटतो, कारण तो सहवास कंटाळवाणा असतो. ज्या ठिकाणी प्रेम नाही, तिथे राहणं- थांबणं नकोसं वाटतं. बंदिस्त वातावरण असेल तर तिथून लगेच निघून यावंसं वाटतं. कारण आनंदाची भावना मेंदूत सुखद हार्मोन्स निर्माण करते. हेच हार्मोन्स पुन्हा पुन्हा हवेसे वाटतात. याउलट जेव्हा कठोर वागणूक मिळतो, तो नकारात्मक अनुभव टाळावासा वाटतो.
तिथून सुटका करून घ्यावीशी वाटते. कंटाळवाण्या वातावरणात कसलेच आव्हान नसते. ज्यात आव्हान नाही, तिथे कंटाळा येणारच. मुलांना कंटाळा आला तर ते एक मिनिटही थांबू शकत नाहीत. आई-बाबांच्या मागे लागून आपली सुटका करून घेतात. शाळेतल्या वर्गामध्येही बऱ्याचदा बंदिस्त वातावरण असते. प्राथमिक शाळेतल्या मुलांना केवळ खडू-फळा यांच्या सहाय्याने शिकवलं, दिवसभर बाकांवर जखडून ठेवलं तर ते त्यांच्या मेंदूसाठी घातक आहे.
पाय मोकळे करायला, मित्र-मत्रिणींशी बोलायला-खेळायला फक्त मधल्या सुट्टीचाच वेळ असेल तर अशी मुलं कंटाळणारच. त्यामुळेच शाळा सुटल्यानंतर आनंदाने मोठ्ठा आवाज करत मुलांचा लोंढा वेगात बाहेर पडतो, कारण त्यांची सुटका झालेली असते! चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संकटात लोटत असतो. ते कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही. काही मुलं एकाजागी बसू शकत नाहीत. एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
मेंदूतला प्री-फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग अद्याप पुरेसा विकसित झालेला नसल्यामुळे हे घडतं. यावर उपचारासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनातून असं आढळलं की, आहारात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी आणि प्रिझव्र्हेटिव्ह असलेले पदार्थ जास्त असले तर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे चांगला व उत्तम आहारच मेंदूला पुरेशा ताकदवान बनवित असतो. केवळ जिभेचे चोचले हे काम करत नाहीत.