- अजान स्पर्धेच्या आयोजनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांचा खुलासा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बांग उर्फ अजान स्पर्धेवरून सगळीकडून थपडा खाल्ल्यावर शिवसेनेचे मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अखेर घुमजाव करत आपला अजान स्पर्धेशी संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. Pandurang sakpal news
भाजपसह सर्व पक्षांनी टीकेची झोड उठवल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पांडुरंग सकपाळ यांची कानउघाडणी केली. नंतर त्यांनी स्पर्धेतून अंग काढून घेतले. तसे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले.
महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत असतानाही हिंदुत्व सोडलेले नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असताना पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेला तडाखे लावले. विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व जागे झाले त्यानंतर
पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही असा खुलासा केला आहे.
अजानमुळे मनाला शांती लाभते, लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचेही सकपाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. महाआरतीप्रमाणेच अजानचे महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणे उचित नाही, असेही ते म्हणाले होते.
“अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले होते.
परंतु, खुलासा करताना सकपाळ म्हणतात, “मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. मी त्यांना सदर स्पर्धा घेण्यासंदर्भात कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. ही स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केल्यास कोरोना विषयक नियमांची पायमल्ली होईल हेदेखील पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले व सदर स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित करण्यास विरोध दर्शवला. मात्र यास शेवटचा पर्याय म्हणून ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यास सुचवले आणि शुभेच्छा दिल्या.”
“अशा प्रकारच्या शुभेच्छा देताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारे धार्मिक अथवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे वेगळ्या अर्थाने राजकारण करण्यात येऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.