रस्ते अपघातातील बळी हा जगभर चिंतेचा विषय आहे. पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या व्यक्तीला दिला जाते. त्यामुळेच आता तेथे अपघातात पायी चालणाऱ्यांच्या जिवीताची कशी काळजी घेता येईला याचा विचार अग्रक्रमाने केला जात आहे. अपघातावेळी गाडीतील लोकांना वाचवण्यासाठी आत एअर बॅगची सुविधा असते.Now the airbag near the bonnet of the car
जितकी मोटार महाग असेल तितकी त्यातील ही सुविधा उत्तम दर्जाची मानली जाते. त्यामुळे अशी गाडी चालवताना अपघात झाल्यास स्टीअरिंग व्हीलमधून ही एअरबॅग बाहेर पडते आणि त्या फुगलेल्या पिशवीमुळे चालकाचे संरक्षण होते. याच तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच पादचाऱ्यांच्या संरक्षणासाठी करण्याचा प्रयत्न स्वीडनची नामवंत वाहन कंपनी वोल्वोने केला आहे. कंपनीने कारमध्ये पादचाऱ्यांचे धडकेपासून संरक्षण करण्यासाठी विशिष्ट एअरबॅग बसवली आहे.
ज्यावेळी या गाडीची धडक एखाद्या रस्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीला बसेल त्यावेळी एका सेकंदात गाडीच्या बॉनेटजवळ असलेल्या भागातील एअरबॅग उघडेल आणि धडकेपासून पादचा-याचे संरक्षण करेल अशी व्यवस्था यात आहे. मात्र त्यासाठी गाडीचा वेग साधारणपणे ताशी बारा ते तीस किलोमीटर असणे बंधनकारक आहे. पादचारी अचानक कारच्या समोर आला की या हवेच्या पिशवीमुळे त्याला फारशी इजा होणार नाही.
गाडीच्या पुढील भागात सात सेन्सर बसवण्यात आले असून मानवी पायाच्या संपर्कात आल्याचे निश्चित झाल्यावर एअरबॅग उघडण्याचे निर्देश सेन्सरद्वारे जारी होणार आहेत. तसेच एअरबॅग उघडण्याबरोबरच गाडीचे बॉनेटही चार इंच वर उचलले जाऊन बसणा-या धडकेचा परिणाम कमी होणार आहे. याद्वारे प्रथमच मोटारीबाहेरील व्यक्तीच्या जीवीताची काळजी घेण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या हे संशोधन प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत सर्वत्र अशा मोटारी दिसल्या तर नवल वाटणार नाही.