महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा संघर्ष तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात मराठा प्रस्थापित मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या अडून लढत आहेत, तर प्रस्थापित ओबीसी नेते हे समोरून लढत उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचे नेमके राजकीय रहस्य काय??, खरे कारण काय??, याचा शोध घेण्याची गरज आहे.Maratha leadership hide behind manoj jarange patil, but obc leaders openly advocating against maratha reservation in obc category
भाऊबीजेच्या दिवसापासून मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा दौरा महाराष्ट्रभर सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रस्थापित ओबीसी नेत्यांनी दंड थोपटत मागच्या दरवाज्यातून मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत जालन्यात एल्गार सभा पुकारली आहे. या सभेत छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे यांच्यासारखे वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रस्थापित ओबीसी नेते उघडपणे समोर आले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या लढ्यात मात्र कोणताही प्रस्थापित मराठा नेता उघडपणे समोर येताना दिसत नाही.
स्वतः मनोज जरांगे पाटलांचा राजकीय कल हा थेट पवारनिष्ठ दिसत असला तरी आणि पवार निष्ठांपैकी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखे नेते जरांगे पाटलांचे उघड समर्थन करत असल्याचे दिसत असूनही जरांगे पाटलांच्या आंदोलनात एक मोठी विसंगती आहे, ती म्हणजे जरांगे पाटलांचे एक समर्थक अभ्यासक नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांनी 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या जीआरचा मुद्दा ही होय. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांच्या थेट जातीवरच प्रहार करून शरद पवार हे मराठ्यांचे खरे नेतेच नाहीत. कारण ते मराठाच नाहीत. ते ओबीसी आहेत. त्यांच्या निवडणूक आयोगातल्या प्रतिज्ञापत्रावर ओबीसी हीच जात लिहिली आहे असे दाखवून दिले. यातून पवारांच्या 50 वर्षांच्या मराठा राजकारणा भोवतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पण त्याचवेळी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचीच शक्ती असल्याचे सूचक विधान राज ठाकरेंनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत करून मराठा आंदोलना मागचे खरे बिंगच फोडले.
मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचे ब्रीदवाक्यच प्रस्थापित मराठा नव्हे, तर गरजवंत मराठा असे करून चलाखी जरूर दाखविली, पण ही चलाखी दाखवतानाच त्यांनी प्रस्थापित मराठा नेत्यांची पुरती पंचाईत करून ठेवली आहे. कारण त्या नेत्यांना धड ना कुणबी प्रमाणपत्र घेता येत, धड ना आपण मराठा आहोत, असे उघडपणे सांगता येत!! त्यामुळे शरद पवारांनी माझी जात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे मोघम वक्तव्य केले, पण आपली जात मराठा की ओबीसी हे बारामतीतल्या पत्रकार परिषदेत उघडपणे बिलकूल सांगितले नाही. निवडणूक आयोगातल्या प्रतिज्ञापत्राच्या विषयाला तर पवारांनी स्पर्शही केला नाही.
मराठा नेत्यांची ही खरी राजकीय गोची आहे. कारण आत्तापर्यंत महाराष्ट्राचे सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा, सर्वाधिक मंत्री मराठा, वेगवेगळ्या सहकार संस्थांच्या शिक्षण संस्थांच्या अध्यक्षापासून सदस्यांपर्यंत सगळीकडे मराठा वर्चस्व, तरीदेखील मराठा समाज मात्र उपेक्षित आणि वंचित. हे चित्र मराठा राज्यकर्त्यांमुळे उभे राहिले. किंबहुना ती वस्तुस्थिती समोर आली. ही मराठा नेत्यांची खरी राजकीय गोची आहे. मराठा नेतृत्वाने आपल्या सत्तेतला वाटा बाकीच्या समाजांना द्यायचे तर सोडाच, खुद्द त्यांच्याच समाजाला नीट उपलब्ध करून दिला नाही. समाजाला न्याय दिला नाही हे चित्र जरांगे पाटलांच्या आंदोलनातून उभे राहिले. मराठा तरुणांचा हा खरा असंतोष प्रस्थापित मराठा नेतृत्व विरुद्ध आहे. ही प्रस्थापितांची खरी गोची आहे. त्यामुळे मराठा नेते जरांगे पाटलांच्या आडून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड करावी लागत आहे.
त्या उलट असली राजकीय गोची ओबीसी नेतृत्वाला बिलकुलच भेडसावत नाही. कारण ओबीसी मूळातच मराठा नेतृत्वाच्या ओझ्याखाली पिचलेले नेतृत्व आहे. ते आजचे नाही, तर गेल्या 60 – 70 वर्षांचे हे पिचलेपण आहे.
ओबीसी ही कायम महाराष्ट्रातीलच काय पण देशातली सर्वाधिक मोठी बँक राहिली पण तिला सत्तेचा वाटा मात्र नगण्य मिळत राहिला. जागृत ओबीसी समाजाला हे डाचते आणि त्यातूनच ओबीसींचे प्रस्थापित आज प्रस्थापित असलेले नेतृत्व साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी उभे राहिले. आजचे भुजबळ – मुंडे – वडेट्टीवार – शेंडगे हे नेते गेल्या 15 – 20 वर्षांमध्ये मोठे नेते आहेत. ते शरद पवार किंवा अन्य मराठा नेत्यांसारखे ते प्रस्थापित 50 – 60 वर्षांचे प्रस्थापित नेते नव्हेत.
त्यामुळे प्रस्थापित ओबीसी नेत्यांना उघडपणे आपल्या समाजासाठी एकत्र येऊन आपले घटनात्मक आरक्षण टिकवण्याची हिंमत होते. ही राजकीय हिंमत प्रस्थापित मराठा नेते दाखवू शकत नाहीत ही खरी पवारनिष्ठ प्रस्थापित मराठा नेत्यांची राजकीय गोची आहे. कारण गेल्या 60-70 वर्षातल्या राजकीय सत्तेपासून आपल्याच समाजाला वंचित ठेवण्याचे राजकीय पाप त्यांनी केले आहे.