आंबे कितीही गोड आणि मधूर असले, तरी वास्तवातले कटू सत्य गोड करण्याची ताकद त्या आंब्याच्या गोडीत नाही. बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन आमरस चाखणाऱ्यांना याची जाणीव झाली आहे. कोलकात्याच्या आंबेवालीला याचा प्रत्यय इथून पुढचे किमान ६ महिन्यांपर्यंत तरी ठायी ठायी येईल. त्याची “व्यवस्था” झाली आहे…!! Mango diplomacy failed; political similarity between Mamata Banerjee and Raju shetty
आंब्याच्या फोडी आणि आमरस दोन्ही गोड लागले… पण… ते पचलेच नाहीत. पचले नाहीत म्हणजे आंबे पाठविणाऱ्याला अद्याप पचले नाहीत आणि आमरस खाणाऱ्याला तर तो ९ महिन्यांनंतरही अजिबातच पचलेला नाही.
आता हेच पाहा ना… ज्या बारामतीच्या गोविंद बागेवर मोर्चा काढला, त्याच गोविंद बागेत जाऊन आमरस चाखला. आधी शेतकऱ्याचा आसूड खुंटीला टांगला. नंतर स्वाभिमान खुंटीला टांगून ठेवून आमरसचा स्वाद चाखला. आमरस तर फार गोड होता. पण ९ महिने उलटले… आमरस अद्याप काही पचला नाही आणि स्वाभिमानीची गाडी विधान परिषदेच्या सभागृहात काही पोहोचली नाही… नजीकच्या भविष्यात पोहोचण्याची शक्यता देखील नाही.
अहो, महाराज पोटूशी बाई देखील ९ महिन्यांत बाळंत होते. त्याच्या पेक्षाही जास्त महिने उलटले पण स्वाभिमानीचा विधान परिषदेचा पाळणा काही अजून हालायला तयार नाही. बहुतेक गोविंद बागेतल्या आंब्यामुळे हे घडले असावे. स्वाभिमानीने भिडे बागेतला आंबा खाल्ला असता, तर कदाचित स्वाभिमानीचा विधान परिषदेचा पाळणा हालला असता…!!
जे गोविंद बागेतल्या आंब्याचे तेच कोलकात्याच्या रसदार हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग वगैरे जातिवंत आंब्यांचे. कोलकात्याचे आंबे राष्ट्रपती भवन, ६ मौलाना आझाद मार्ग, ७ लोककल्याण मार्ग, ६ ए कृष्ण मेनन मार्ग वगैरे ठिकाणी अगदी सुखरूप पोहोचले. त्याच्या फोडी तर फार म्हणजे फारच गोड लागल्या. दिल्लीकरांची तोंडे अगदी गोड गुलाबी गुळचट होऊन गेली… पण त्याने दिल्ली – कोलकाता नात्यातली कटूता काही संपली नाही.
राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट घेऊन ७ लोककल्याण मार्ग आणि ६ ए कृष्ण मेनन मार्ग यांच्या बद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात येणार आहे. या तक्रारी कोणत्या आहेत हे काही फार मोठे गुपित नाही.
आणि अशा तक्रारी झाल्या म्हणून दिल्लीतून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कोलकात्याला निघालेल्या टीम माघारी फिरणार नाहीत की त्यांनी बंगालमध्ये जे रक्तलांछित बघितले त्याचा रंग फिकट करून ते केंद्राला रिपोर्ट सादर करणार नाहीत. जो रिपोर्ट द्यायचा तो त्यांनी एक तर आधी दिला आहे. उर्वरित रिपोर्ट आणखी बंगाल दौऱ्यानंतर देण्यात येतील. कारण मानवाधिकार आयोगाच्या दुसऱ्या टीमचे दौरे आजपासून (सोमवार ५ जुलैपासून) सुरू व्हायचे आहेत.
आंबे कितीही जातिवंत असले, गोड – मधूर असले, तरी वास्तवातले कटू सत्य गोड करण्याची ताकद त्या आंब्याच्या गोडीत नाही. त्यामुळे त्याच्या फोडीत किंवा रसातही ती उतरत नाही. बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन आमरस चाखणाऱ्यांना याची जाणीव झाली आहे. कोलकात्याच्या आंबेवालीला याचा प्रत्यय इथून पुढचे किमान ६ महिन्यांपर्यंत तरी ठायी ठायी येईल. त्याची “व्यवस्था” झाली आहे…!!
Mango diplomacy failed; political similarity between Mamata Banerjee and Raju shetty
महत्त्वाच्या बातम्या
- CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony : 45 वर्षीय धामी बनले राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री, सतपाल यांच्यासह 11 जुन्या मंत्र्यांच्याही शपथविधी
- पदासाठी चळवळ करणं कोणाच्याही मनात येऊ नये, छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- Aamir Khan Divorce : घटस्फोटानंतर आमिर – किरण यांची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना दिला हा संदेश