प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन काही विभागांमध्ये पाऊस झाला असला, तरी राज्यात अजूनही सर्वत्र मान्सूनच्या पावसाचे आगमन झालेले नाही, त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी करू नयेत, असे आवाहन ठाकरे – पवार सरकारचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आपल्या विभागात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीची कामे करू नयेत, असे कृषी खात्याने आवाहन केले आहे. Maharashtra farmers expecting mansoon rains; IMD issues warning of heavy rains in two days
मात्र, येत्या १७, १८ जूनला राज्यात जोरदार पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई-ठाणे कोकणमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १७ आणि १८ जूनला मुसळधार पावसाचा शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
जून महिना अर्धा संपला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. आज जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर मराठवाड्यात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोडसह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह आज जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह सोयाबीनची पेरणी सुरू असल्याने या पावसाचा फायदा लागवड आणि पेरणी केलेल्या पिकांना होणार आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे.
मात्र काही ठिकाणी आणि जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसावरच शेतकऱ्यांच्या पेरणीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे काही भागात पाऊस झाला असला तरी सर्वत्र पाऊस कधी होणार आणि पेरण्या कधी होणार याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.