माणूस जन्मापासूनच्या असंख्य घटना, दृश्ये, त्यांचे परस्पर संबंध साठवून ठेवू शकतो आणि संदर्भानुसार कोणतीही घटना क्षणार्धात जागृत स्मृतीत आणू शकतो. मानवी स्मृती, ज्ञान व बुध्दी यांचा शोध घेतल्याशिवाय बुध्दीमान संगणक बनविता येणार नाही हे जाणून संशोधकांनी प्रयत्न सुरू केले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की येथे केवळ संगणकशास्त्र पुरे पडत नाही.In the ability to think the root of the intellect
शरीरशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी विविध दृष्टकोनातून त्याचा अभ्यास करावा लागतो. या स्मृतीचा अंदाज केला तर अशी स्मृती साठविण्यास संगणकास अवाढव्य यंत्रणा लागेल. प्रकाश, आवाज, स्पर्श, वास, चव या सर्व संवेदना माणूस एकाच वेळी एखाद्या चित्रफितीप्रमाणे नोंदवून घेतो व त्याचे स्मृतीत रूपांतर करतो आणि पूर्वीच्या स्मृतींशी त्याचे नाते जोडतो.
ही क्रिया जागृत अवस्थेत प्रत्येक क्षणी होत असते व त्यावेळी मेंदू दुसऱ्याच कोठल्यातरी स्मृतीसंदर्भात विचार करीत असतो. या तऱ्हेची क्षमता संगणकात आल्याखेरीज त्याला मेंदूसारखा म्हणता येणार नाही. देान वस्तूतील फरक ओळखण्यासाठी संगणकास त्या दोन्ही वस्तूंचा सर्वांगाने अभ्यास करावा लागतो. मात्र अगदी अशिक्षित गृहीणीदेखील अगदी एकसारख्या दिसणाऱ्या दोन भांड्यातील फरक ओळखू शकते.
चेहऱ्यावर बदललेले भाव माणसाला २/१० सेकंदात ओळखता येतात. मेंदूची बरोबरी करण्यासाठी संगणकास याबाबतीतही बरीच प्रगती करावी लागेल. इ.स. १६५० मध्ये थॉमस हॉब्जने विचार करणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विशिष्ट संकल्पनांच्या गणिती क्रिया होत असे मत मांडले. सध्याचे सर्व संगणक ह्याच गणितावर आधारलेले आहेत.
मात्र तर्कावर आधारलेल्या गणितास सत्य व स्पष्टपणे वर्गीकरण करता येईल अशी माहिती हवी असते. मेंदू मात्र अशा माहितीबरोबरच संदीग्ध, संभाव्य वा कमी विश्वसनीय अशा माहितीचाही परामर्श घेऊ शकतो. मानवी बुध्दीमत्तेची वैशिष्ट्ये म्हणजे नवे ज्ञान मिळविण्याची किंवा शिकण्याची क्षमता व निर्णय घेण्याची क्षमता. मानवी बुध्दीचे मूळ त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेत, व ही क्षमता मानवी मनात दडलेली असल्याने संगणकशास्त्रज्ञ सध्या मनाच्या आंतरस्वरूपाचा शोध घेत आहेत.