अतिरिक्त पैसा मिळवायचा असेल तर पैशाला कामाला लावायला हवे आणि आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायला हवे. आपण निवृत्त होऊ तेव्हा आपल्याजवळ पुरेसा पैसा असावा हे सगळं आपल्याला पटत असते. पण यासाठी काहीएक निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपण उदासीन राहतो. याच्या उत्तरादाखल किमान चार स्पष्टीकरणे किंवा कारणे मिळतात. जवळ पैसाच नाही. आपल्याजवळ अर्थविषयक गंभीर निर्णय घेण्याइतका पैसा नाही, असे आपल्याला वाटत असते.Don’t go for less that your full potential
आपल्याला घरासाठी हप्ता भरायचा असतो, अनपेक्षित खर्च येत असतात. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण असलो तरी, एखादी गुंतवणूक करायची असेल तर आपल्याजवळ पुरेसा पैसा नाही, हीच धारणा असते. मग लहर आली की दिसेल त्या आर्थिक योजनेत गुंतवणूक करणे आपल्याला सोपे वाटते. त्यामुळे वेळोवेळी विविध गुंतवणूक योजना खरेदी केल्याची मोठी यादी आपल्याकडे तयार होते. उदाहरणार्थ, एक लाख रुपये महिना वेतन घरी नेताना आपण प्रत्येकी दोन हजार रुपये अशा चार एसआयपींमध्ये पैसे गुंतवले आहेत, असे आपल्या लक्षात येते.
आपण विविध आर्थिक योजनांच्या पर्यायांनी प्रभावित होतो. चुकीची योजना निवडल्यास पश्चात्ताप होईल, याचीही भीती आपल्याला वाटते. आपण ब्लूचिप कंपनीत किंवा लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करतो आणि मग कळते की मिड कॅप फंडाची कामगिरी चांगली होते आहे; किंवा आपल्याला माहिती नाही म्हणून न निवडलेल्या आयपीओची कामगिरी चांगली झाली होती. असे झाले की आपल्याला गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर पैसा निर्माण करणाऱ्या लोकांचा हेवा वाटायला लागतो आणि यातून आपल्याला योग्य आर्थिक योजना निवडता येत नाही, असे स्वतःला बजावू लागतो. मग आपण आपला पैसा तसाच पडून राहू देतो; मात्र योजना निवडण्यात आपण चूक केली हे मान्य करत नाही. गुंतवणूक केलेल्या योजनेवरील आपले नियंत्रण सुटलेले आपल्याला मुळीच चालत नाही. उत्तम योजना, त्यासाठी आपण केलेला पूर्वाभ्यास व तयारी असे असूनही काही वेळा या योजनेची निवड चुकू शकते.
एक लक्षात घ्यायला हवे की, चढउतार हा भांडवल बाजाराचा स्वभाव आहे. त्यामुळे भविष्यात बाजार कशा प्रकारे वाटचाल करेल, याचे आडाखे बांधता येत नाहीत. त्यामुळे येथे नियंत्रण मिळवण्याचा उद्देश सफल होतोच असे नाही. जोखीम व चढउतार यांच्याशी सामना करत असाल तर काही काळ काहीही न करणे हा चांगला पर्याय असू शकतो. याचे कारण, बँकेच्या खात्यात पैसा पडून आहे म्हणजे त्यावर किमान व्याज तरी मिळत राहील, अशी आपली धारणा असते. या सगळ्याचा विचार करता, आपण काहीच ठरवायचे नाही हा मार्ग अनुसरतो. गुंतवणुकीमध्ये उत्तम पर्याय, उत्तम योजना किंवा उत्तम वेळ अशी काही नसते, हे लक्षात ठेवायला हवे. गुंतवणूक करणे म्हणजे तुमची बचत वेगवेगळ्या मत्तांमध्ये (अॅसेट्स) टाकणे, जेणेकरून तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळतील. त्यामुळे यासाठी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागल्यास त्या न कंटाळता कराव्यात.