आपल्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. आयुष्य कशाला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. घरात काम करणाऱ्या मावशींनी थोडं काम कमी केलं किंवा एक कोपरा नीट साफ नाही केला. Don’t give sharp reactions
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून काम व्यवस्थित झालं नाही, रस्त्यात कोणीतरी अचानक कट मारून गेलं, रेस्टॉरंटमध्ये वेटरनं ऑर्डर चुकवली, प्रिंटआउट उलटी आली, रिक्षावाल्या दादांकडं दोन रुपये सुट्टे नव्हते, बायकोकडून चुकून मीठ किंवा तिखट जास्त पडलं… अशा हर प्रसंगी आपण उत्तेजित होत असतो आणि प्रतिक्रिया देत असतो.
या प्रतिक्रिया आपल्या नकळत टोकदार, समोरच्याला बोचणाऱ्या किंवा आपल्यालाच मनस्ताप देणाऱ्या असतात. आता या सगळ्या घटना घडून गेल्यावर एका तासाने यांचा परिणाम किती टिकतो याचा कधी विचार केला आहे? अक्षरशः शून्य! आपण विसरूनही जातो की असं काही झालं होतं. पण त्यावेळी आपण एकदम शार्प रिअॅक्शन देऊन स्वतःला व समोरच्याला वेदना देऊन मूडही घालवतो.
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. एखाद्या गोष्टीचा परिणाम जर तुमच्या जीवनावर पुढील पाच वर्षे होणार नसले तर त्वायर पाच मिनिटेही चिंता करून वेळ व्यर्थ घालवू नका. व्यवसायात अनेक प्रसंग येतात जेव्हा उद्योजकांसमोर पेच निर्माण होतात किंवा हताश करणाऱ्या घटना घडतात, तेव्हा त्यांनी जरा थांबून विचार करावा की त्यांना पुढील पाच वर्षात कुठे पोहोचायचं आहे.
तुमच्या योजनांना इतक्या विस्तारित रूपात जेव्हा पाहाल तेव्हा समोर वाढून ठेवलेल्या प्रसंगांना कशाप्रकारे हाताळायचं याचं अचूक उत्तर सापडेल आणि मनस्तापही होणार नाही. आपण सर्व गोष्टींना इतक्या जवळून पाहतो, की त्यावेळी त्या खूप मोठ्या भासतात. अंतर निर्माण करता आलं, तर त्याच गोष्टी स्पष्ट दिसतात व छोट्या वाटतात आणि योग्य व पटकन निर्णय घेता येऊ शकतो.