विनम्रता वागण्यातून, बोलण्यातून, खास करून संवाद, संभाषण आणि देहबोली यावरून आपल्याला ओळखू येते. कोणी मोठ्या पदावरची व्यक्ती आली तर आपण उठून उभे राहतो, किंचित मान वाकवून शुभेच्छा देतो. याला शिष्टाचार पाळणे असेही आपण म्हणतो. माणूस बोलतो कसा यावरूनच नाही, तर तो कोणासमोर उभा कसा राहतो, सर्वांमध्ये बसतो कसा यावरूनही त्या माणसाचे मन आपण पारखत असतो.Donot tingle anyone back
कॉर्पोरेटमध्ये काम करताना फक्त आपल्या देशाचे नव्हे, तर ज्या परदेशी कंपनीचे काम आपण करत आहोत तिथलेही शिष्टाचार आपण पाळतो किंवा पाळावे लागतात. विनम्रता ही या शिष्टाचाराचे शुद्ध स्वरूप आहे, कारण फक्त माणसेच नाही, तर सर्व जीवसृष्टीबद्दल मनात असलेला आदर आणि आपलेपणाही यामध्ये समाविष्ट आहे. म्हणूनच करावे लागते म्हणून आपण किती करतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून ते किती वेळा घडते, यावरून आपण विनम्र या मनोभूमिकेत आहोत की नाही ते समजते. जर त्या मनाच्या भूमिकेत आपण नसू, तर हे शिष्टाचार केवळ कामाचा भाग म्हणून पाळले जाणारे. मग एरवी तसेच दिसत नाहीत.
समोर असताना नीट बोलणे मग माघारी टिंगल, टवाळी, मस्ती असेही प्रकार दिसतात. समोरासमोर उर्मट आणि उद्दामपणे वागणे बोलणे जितके योग्य नाही तितकेच माघारी वाईट बोलणे आणि अपमानकारक बोलणे हे योग्य नाही. कारण ही माणूस म्हणून कोणाविषयी असणारी समजूत नाहीये. तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर असे वागणे सर्वथा चुकीचे ठरते.
साधारण विविध वयाची माणसे, विविध टप्प्यावर कशी वागतात, साधारण समस्या काय असतात, कोणत्या प्रसंगी काय निर्णय घेतात याची जर आपल्याला समजूत आलेली असेल, तर समजा कधी समोरचा उघड उघड आपला अपमान करत असला, तरी केवळ त्याच्या शब्दांकडे लक्ष न जाता असे का होत असावे, इतका राग का याच्या मनात असेल असा विचार पटकन केला जातो आणि त्या रागावर पटकन प्रतिक्रिया देण्यापेक्षा… तुम्ही शांत व्हा, आपण यावर बोलूया, मी नक्कीच तुमचे ऐकून घेईन, माझीही बाजू आपण ऐकावी, असे काही उत्तरादाखल बोलले जाते.