वृत्तसंस्था
गुवाहाटी – आसाम – मिझोराम पोलीसांमध्ये दोन राज्यांच्या सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी आसाम बाबत आली आहे. आसाम – नागालँड सीमेवर दोन्ही राज्यांनी आपापले पोलीस माघारी घेण्याचा उभयमान्य तोडगा काढला आहे. Assam CM HB Sarma tweets: “In a major breakthrough towards de-escalating tensions at Assam-Nagaland border
आसाम आणि नागालँड या राज्यांच्या मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन हा तोडगा काढला. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी तो ट्विट करून जाहीर केला आहे. आसाम आणि नागालँड यांच्यातही सीमावाद असला तरी दोन्ही राज्यांचे पोलीस फॉरवर्ड पोस्टमधून निघून आपापल्या राज्यांमधल्या बेस कँपमध्ये जातील असा हा तोडगा आहे.
दोन्ही राज्ये वादगस्त असलेल्या सीमाभागात सॅटेलाइट पिक्चर्सच्या आधारे आणि यूएव्हीच्या आधारे लक्ष ठेवतील. दोन्ही बाजूंनी सामंजस्याने चर्चा करून सीमावाद सोडविण्यात येईल, असे आसाम आणि नागालँड या दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांच्या झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
आसाम – मिझोराम राज्यांच्या पोलीसांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत आसामच्या सहा पोलीसांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण तयार झाले आहे.या पार्श्वभूमीवर आसाम – नागालँड यांच्यातील सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याची सकारात्मक बातमी आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्या विरोधात मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल केला आहे. हा पोरकटपणा असल्याची टीका आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी केली आहे. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांची वर्तणूक ही राजनैतिक मुत्सद्याला शोभणारी नाही. त्यांना त्यांची चूक लवकरच समजेल. त्यानंतर मिझोरामच्या अधिकाऱ्यांशी देखील आसामचे अधिकारी चर्चा करतील, असे अशोक सिंघल यांनी सांगितले.