वृत्तसंस्था
मुंबई – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या बरोबरीने भारतीय तटरक्षक दलाच्या ४० टीम्स सज्ज आहेत. तटरक्षक दलाने मार्गदर्शन केल्यानुसार महाराष्ट्रात ४५२६, गुजरातमध्ये २२५८ मच्छिमार बोटी खवळलेल्या समुद्रातून किनारपट्टीवरील बंदरांमध्ये सुरक्षित परतल्या आहेत. तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. all 4526 fishing boats of Maharashtra & 2258 boats of Gujarat have safely returned to harbour from the sea: ICG
पश्चिम किनाऱ्यावर खवळलेल्या समुद्रात महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध बंदरांमधून मच्छिमारांच्या सुमारे ५६०० बोटी गेल्या होत्या. त्यामध्ये ३३५ व्यापारी जहाजांचाही समावेश होता. त्यापैकी सर्व बोटी किनाऱ्यावर सुरक्षित परतल्या आहेत. तटरक्षक दलाने बोटींच्या सुरक्षित परतण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले आहे. सर्व बोटी किनारपट्टीवर सुरक्षित परतेपर्यंत तटरक्षक दल हाय ऍलर्टवर राहणार आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमधून बोटींच्या हालचालींवर देखरेख केली आणि त्यांना सुरक्षित पोहोचण्याचे सिग्नल दिले गेले.
वादळग्रस्तांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाची ७५ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ३७ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर दलाच्या ४० तुकड्या बोटी, लाइफ जॅकेट्स आणि सुरक्षा साहित्यासह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची हालचाल वेगात व्हावी यासाठी हेलिकॉप्टर्सही त्यांच्या मदतीस तैनात ठेवण्यात आली आहेत. मेडिकल टीम्स आणि अँब्युलन्सची व्यवस्था हाय ऍलर्टवर ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही प्रवक्त्याने दिली आहे.